महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी: गणेश पवार
दि.७/११/२०२० राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी आता पेटलेली आहेत. मात्र साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या करारा संदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात सरकार वारंवार टाळाटाळ करत आहे यामुळे येत्या ३० नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. अशी माहिती कामगार नेते तात्यासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली येथील वसंत दादा साखर कारखान्याच्या परिसरातील कामगार भवन येथे कामगार व पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला राज्यस्तरीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार महासंघाच्या वतीने हा संप करण्यात येणार आहे अशी माहिती दोन्ही संघटनांच्या वतीने देण्यात आली.
साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी यावेळेस असे सांगितले की, साखर कामगार व मजूर ऊसतोड मजूर यांचे पगार व मजुरी ठरवण्यासाठी शासन स्तरावर त्रिसदस्यीय समिती नेमली जाते यामध्ये शासन कारखाना प्रशासन व कामगारांचा प्रतिनिधी यांच्यातील प्रत्येकी एक सदस्य निवडला जातो व यांच्या मार्फत कामगारांचे पगार व ऊस तोडणी कामगारांची मजुरी शासनास सुचवली जाते व शासन त्याप्रमाणे पगार वाढ करत असते. पूर्वी तीन वर्षातून एकदा समितीची स्थापना केली जायची. मात्र आता पाच वर्षातून एकदा समिती स्थापन केली जाते. मागील समितीची मुदत मार्च २०१९ रोजी संपली आहे.
पूर्वीच्या भाजप-शिवसेना युती सरकार व आत्ता कॉंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना हे महा विकास आघाडी सरकार ही समिती स्थापन करण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे येत्या ३० नोव्हेंबर पासून राज्यातील २०२ सहकारी व ७२ खाजगी कारखान्यातील कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.