डोंगरमाथ्यावर शेततळी बांधल्यास शेतकऱ्यांचा फायदा : विक्रमसिंह पाटणकर
पाटण प्रतिनिधी : पश्चिम घाटात दुर्गम व डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पडीक क्षेत्र असून या क्षेत्राचा वापर करून ठिकठिकाणी शेततळी घेतल्यास त्यात लाखो लिटर पाणी साठविले जावू शकते. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वनशेती, सुगंदी औषधांची शेती, फळझाडे लागवड करून आपल्या शेतीसह पिण्याच्या पाण्याबरोबर मच्छीपालनसारखे व्यवसायही करता येवू शकतात. डोंगरमाथ्यावरील शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान आहे. शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय विविध योजनांसंदर्भात ऑनलाईन नोंदणी सुरू असून शेतकऱ्यांनी या योजनांचा पुरेपूर वापर केल्यास त्यांच्या उत्पन्नात भरेल व आर्थिक जीवनमान उंचावेल, असा विश्वास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.पाटण येथील शिक्कामॅन्शन याठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.माजी मंत्री पाटणकर पुढे म्हणाले, पाटण तालुक्यात सर्वाधिक पाऊस हा दुर्गम व डोंगरमाथ्यावर पडतो. पडणारे हे पावसाचे पाणी असेच वाया जाते. हे पाणी डोंगरमाथ्यावर तलाव बांधून अडविल्यास त्याचा शेतकऱ्यांना सर्वांगीण विकास साधण्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल. त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी, त्याचबरोबर डोंगर उतारावरील गावातील शेतीला, वनशेती, औैैषधी वनस्पती, फळझाडे लागवड केल्यास त्याला ग्रॅव्हीटीद्वारे देता येईल. शिवाय नैसर्गिकरित्या पाणी या तलावात साठवले जाणार असल्याने त्यासाठी वीज अथवा कोणत्याही इंधनाची गरज भासणार नाही. यामुळे संपूर्ण पडीक क्षेत्रात कोट्यवधींची झाडे लागवड शेतकरी करतील. केंद्र शासनाच्या व आयुष्य मंत्रालय विभागामार्फतही मोफत फळझाडे, औषधी वनस्पती यांची रोपे दिली जातात. त्यांचे रोपण त्याठिकाणी केल्यास त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. भविष्यात शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन तयार होईल. वनविभागाच्या भोवतालचे क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. शेतकरी घरदार सोडून शहराकडे जात आहे. गावे बकाल होत आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील 46 गावांतील शेतकऱ्यांच्या मालकीचे पडीक क्षेत्र लागवडीखाली आल्यास मोठ्या प्रमाणावर फळझाडे, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती निर्माण होतील व शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बारा महिने शेतीला पाणी देखील मिळेल. शिवाय पडीक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात वृक्ष व जंगले निर्माण होतील. पर्यावरणात प्रचंड प्रमाणात एकाचवेळी वृक्षलागवड होवू शकेल. शेतकरीही स्वत:च्या मालकीची झाडे असल्याने त्यांचे संगोपन व संवर्धन चांगल्या पध्दतीने करतील.शेततळी, वनतळी बांधण्यासाठी शासनाने अनेक योजना जाहिर केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना शेतकऱ्यांपर्यत पोहोचवल्या पाहिजेत. भौगोलिकदृष्ट्या परिसराचा अभ्यास करून शेतकऱ्यांना याबाबत जेवढी माहिती देता येईल तेवढे मी देत आहे. अगदी पश्चिम घाटापासून राधानगरी ते लोणावळ्यापर्यंत पडीक जमिनी आहेत. मात्र त्याठिकाणी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही.
त्याचा दुष्परिणाम स्थानिक जनतेला जाणवतो. शेतीपूरक योजनांचा लाभ हा शेतकऱ्यास मिळाला तर त्याच्यापदरी फायदा होवून उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांना ही चांगली संधी आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करून त्याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहनही माजी मंत्री पाटणकर यांनी शेवटी बोलताना केले आहे.