सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत १६९ जण कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६९ रुग्ण उपचाराखाली आहेत. ७ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. असे सांगून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातून तसेच कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातून लोक आल्याने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अशा स्थितीत ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन करण्यात आले आहे त्याठिकाणी वैद्यकीय यंत्रणा प्रत्यक्षात जाऊन तपासणी करते का? क्वारंटाईन लोकांच्या निवास, न्याहरी व भोजनाच्या सुविधा कशा आहेत, याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी सर्व अद्ययावत उपचार देण्याचे निर्देशही आरोग्य यंत्रणेला दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन, हृदयविकार सारखे आजार असणाऱ्या अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कोणकोणते प्रयत्न केले याचा आढावा घेऊन, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी अद्ययावत सर्व उपचार द्या, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी अतिजोखमीच्या भागातून आलेल्या ५० वर्षावरील व्यक्तींच्या कोरोना चाचणीसाठी मोहिम सुरु करण्यात आली असून, क्वारंटाईनच्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या तपासणीबाबत शहानिशा करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आले असल्याचे सांगितले. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी सुरु करण्यासाठी आयसीएमआरआयकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगून या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळून प्लाझ्मा थेरपी नुसार उपचारही लवकरच सुरु होतील असे स्पष्ट केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने सर्व समावेशक प्रस्ताव तयार करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. लॉकडाऊनच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबाजवणीच्या अनुषंगाने आढावा घेतला.





















