महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी…
राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत ही एप्रिल ते जून दरम्यान समाप्त झाली असून १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत येत्या जुलै ते डिसेंबर याकालावधीत समाप्त होत आहे.
सद्यस्थितीत यापूर्वी मुदत संपलेल्या ज्या ग्रामपंचायतीं वर शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा अधिकाऱ्यांची कोरोना या महामारी च्या कामासंदर्भात आवश्यकता असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करून त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे त्याऐवजी वकीलांची ग्रामपंचायत प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अपर जिल्हा न्यायालय वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अॅड. आकाश ठोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाने जारी केलेल्या जी आर नुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे आदेश आहेत. जर अशा प्रकारे प्रशासकाची नियुक्ती केली गेली तर ती निश्चितपणे एखाद्या राजकीय कार्यकर्त्याची होऊन सदर नियुक्तीमुळे मोठे राजकीय वाद उद्भवू शकतात अशी भीतीही अॅड. आकाश ठोळे यांनी व्यक्त केली.
खरेतर नियुक्ती करावयाचा प्रशासक हा सरकारचा प्रतिनिधी असतो व शासकीय अधिकारीच असतो. प्रशासक म्हणून काही अनियमित काम केल्यास त्याच्या आयुष्यभराच्या नोकरीवर गदा येण्याची त्याला भीती असते. परंतु, सद्यपरिस्थितीत, एवढ्या मोठ्या संख्येने असे शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही. म्हणून सरकारने ग्रामपंचायत प्रशासक म्हणून वकिलांची नेमणूक करावी. वकिलांचा कायद्याचा अभ्यास आणि वकील म्हणून प्रत्येक सरकारी कार्यालयात असणारा वावर, त्यामुळे ग्रामपंचायतचा प्रशासक म्हणून जबाबदारी मिळाल्यास संपूर्ण वकील बांधव ही जबाबदारी उत्तमरित्या निभावतील. वकील हे अॅडवोकेट अॅक्ट नुसार विधी अधिकारी असतात. त्यांच्यावर सदर कायद्याचे नियंत्रण असते. काही अनियमितता झाल्यास अॅडवोकेट अॅक्ट नुसार संबंधिताच्या वकिली व्यवसायावर गदा येईल याची धास्ती असते त्यामुळे प्रशासकाची जवाबदारी ही सामान्य व राजकीय प्रभावित व्यक्तीस देण्याऐवजी ती प्रशासन योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता असलेल्या व कायद्याची माहिती व जाणकार असलेल्या व्यक्तीस म्हणजेच विधीज्ञाची संबंधीत तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी. त्यामुळे, कोरोना या महामारीच्या या संकट काळात विधीज्ञ हे आपली सेवा देऊन सरकार व राज्याला मदत करतील व आपला खारीचा वाटा उचलून सहकार्य करतील अशी अपेक्षा अॅड. आकाश ठोळे यांनी व्यक्त केली आहे.