बिदाल प्रतिनिधी :
मुलांमध्ये मोबाईल वापराचं प्रमाण जास्त आहे. दिवसेंदिवस संवाद कमी होत चालला आहे.भविष्यकाळामध्ये हे घातक परिणाम दिसून येतील यासाठी मुलांमध्ये लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करणं किंबहुना वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरी प्रतिपचंद्र चे लेखक श्री. डॉ. प्रकाश कोयाडे (पुणे ) यांनी व्यक्त केले.
गोंदवले ता. माण येथे खाजगी कार्यक्रमासाठी आले असता दहिवडी येथे संतोष बोराटे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सत्कारप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सिरसवाडी कादंबरीचे लेखक श्री. गणेश बर्गे (खटाव) न्यू इरा प्रकाशन पुणे चे संतोषदादा पाचे , संतोष बोराटे, प्रा. जठार सर, प्रा. शैलेश बोराटे, किरण बोराटे, संतोष शिंदे उपस्थित होते. सध्या तरुण पिढी, लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिरेकी वापर होतोय. यामुळे मोबाईल वापर हे व्यसन झालं आहे. मुलांनी मोबाईल वापर गरजेपुरता करावा. क्रमिक पुस्तकांबरोबर रिकाम्या वेळी मोबाईल वापराऐवजी वेगवेगळ्या आशयाची आवडीची पुस्तक वाचावीत. सततच्या वाचन सवयीमुळे ज्ञान वाढते. वैचारिक प्रगल्भता येते. पुस्तकं हिचं आपले मित्र आहेत. पुस्तकांशिवाय हे आयुष्य खूप अपूर्ण आहे. ह्या नवीन पीडिमधूनच भविष्यामध्ये लेखक, साहित्यिक तयार होणार आहेत. पुस्तकं वाचन हे आपलं व्रत असलं पाहिजे असं सांगून त्यांनी प्रतिपचंद्र कादंबरी विषयी बोलताना म्हणाले कि, इतहासिक संदर्भ आणि कल्पनाशक्तीचा वापर करून खूप रहस्यमय आणि गूढ कथानक तयार झाले.चौदावे शतक, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाला जोडणारी इतहासिक थरार कादंबरी म्हणजेच ‘ प्रतिपचंद्र’. ही कादंबरी सर्वांनी वाचावी असे आव्हानही डॉ. कोयाडे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर शिसवाडी कादंबरीचे गणेश बर्गे यांनीही कादंबरी लिखाणापासून पुस्तक निर्मिती पर्यंत प्रवास याविषयी माहिती दिली. डॉ. प्रकाश कोयाडे यांचा सत्कार संतोष बोराटे यांच्या हस्ते करण्यात आला.
दहिवडी (ता माण ) येते लेखक प्रकाश कोयोडे यांचा सत्कार करताना (छायाचित्र आकाश दडस )