महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / खटाव :
खटाव माण साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम २०२०-२१ चा गळीताचे दि १६ नोव्हेंबर ते दि १५ डिसेंबर २०२० पर्यंतचा पहिल्या बिलाचा दुसरा टप्पा २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.
खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ कारखान्याच्या कार्यस्थळी चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, यंदाच्या हंगामातील आजपर्यंत दोन लाख एकसष्ठ हजार मेट्रिक टनाचे उसाचे विक्रमी गाळप खटाव माण अँग्रो ने केले आहे, चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आज कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बिलास वेळेवर प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे याठिकानची विश्वासहर्ता वाढून “खटाव माण अँग्रो” कडे उसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गतवर्षी ऊस दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन राहिल्या अन्य ऊस पट्ट्यातील ऊसाला तोडणी यंत्रणा देऊन सर्व उसाची आवक कारखान्यात होऊन भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे म्हणाले, साखरेच्या गुणवत्तेत खटाव माण अँग्रोने महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळवला असून कारखान्यातील अन्य उत्पादने ही कारखान्यातून विक्री होत आहेत. त्यामाध्यमातून खटाव माण बरोबर कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांच्या हितासाठी कारखान्याबरोबरच जास्तीतजास्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.