महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
कोरोना महामारी व अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत मिळावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे निवेदन रयत क्रांती संघटना सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव,युवक अध्यक्ष प्रकाश साबळे व प्रकाश माने कोरेगाव यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले असून त्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की,मागील एक वर्षापासून राज्यातील नागरिक कोरोना व नैसर्गिक आपत्ती व बेजबाबदार राज्यसरकार मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत तसेच छोटे व्यवसायिक सुद्धा प्रचंड अडचणीत आले आहेत तरी रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यातील नागरिक व शेतकरी यांच्यासाठी न्याय मागण्या करत आहे.
सदर मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाउन उठल्यानंतर तीव्र आंदोलन राज्यभर करण्यात येतील.आत्तापर्यंत झालेल्या कर्ज माफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात यावी व तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे, छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत करण्यात यावी,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा,कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा व पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी.कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असून या काळामध्ये शेतकरी व व्यवसायिक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासन व अत्यावश्यक सेवेमध्ये राज्याला मदत केली आहे परंतु त्यांच्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे शेतकरी,छोटे व्यवसायिक अडचणीत आले असून अशा काळामध्ये शासन व प्रशासनाने संबंधित व्यक्तींना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरील मागण्यांचा संवेदनशीलपणे सहानुभूती पूर्वक विचार करून त्वरित निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे.






















