सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० पालखी सोहळ्यातील सुमारे पंधराशे दिंड्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी १०१७ दिंड्यांना अनुदान मंजूर झाले आहे. त्याचप्रमाणे शेकडो दिंड्यांना अनुदान वितरीतही करण्यात आले आहे. ज्या दिंड्यांना निधी उपलब्ध झाला नाही त्याचे कारण राजकीय नसून प्रशासकीय आहे. अनेक दिंड्यांकडून पुरेसे आणि आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने अजून त्यांना निधी उपलब्ध झालेला नाही अशी माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सातारामध्ये दिली.
हे राज्य सरकार ऑनलाइन किंवा फेसबुक लाइव्ह करणारे नसून प्रत्यक्ष लाइव्ह हजर राहून समस्यांचा आढावा घेते. या दिंड्यांच्या विषयीसुद्धा ज्या दिंड्यांकडून आवश्यक कागदपत्रे आलेली नाहीत त्यांच्याकडून ती मागवण्यात आली आहे. त्यांचे खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहितीची पूर्तता झाल्यावर त्यांना तत्काळ निधी मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, हा आमचा शब्द आहे. ज्याप्रमाणे आम्ही लाडक्या बहिणींना शब्द दिला होता आणि त्याची पूर्तता केली, त्याचप्रमाणे वारकरी बंधू-भगिनींनाही दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत.वारकरी समुदायाकडूनही सहकार्य होत असून अपूर्ण माहिती आणि त्रुटींची पूर्तता ते आता करत आहेत.
वारकरी दिंडीसोबतच ज्येष्ठ नागरिक वारकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणासुद्धा आमच्या सरकारने केली होती. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करून त्यासाठी ५० कोटीचे प्रारंभित वाटपही जाहीर केले. सरकारकडून निर्मल वारीसाठी ३६.७१ कोटी उपलब्ध करून देण्यात आले होते. या सगळ्यासाठीची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे आणि तिची अंमलबजावणी झालेली लवकरच दिसणार आहे.
वारकरी बंधू-भगिनींना दिलेला शब्द हा विठ्ठलभक्त नक्की पाळणार आहे.
मात्र विरोधकांनी थोडे थांबून विचारमंथन करावे. एकीकडे हे अनुदान जाहीर झाल्यावर हिंदुत्त्ववादी सरकारने अनुदान दिले असे म्हणत विरोधकांनी त्यावर टीका केली. दुसरीकडे आता ही सर्व प्रक्रिया सुरू असताना अनुदान मिळालेच नाही म्हणत बोंबाबोंब करत आहेत.
लाडकी बहिण योजनेच्या बाबतीतही असेच झाले. योजना सुरू झाली तेव्हा प्रचंड टीका झाली. मात्र आता खरोखरच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जेव्हा पैसे टाकले तेव्हा विरोधकांची बोलती बंद झाली. वारकरी अनुदानाच्या बाबतीतही तसेच होईल. मायबाप जनता हीच आमचा विठ्ठल असून त्यांच्या सेवेत हे सरकार कायम रुजू असल्याचे भोसले म्हणाले.