राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे.
राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असं माहिती व जनसंपर्क विभागाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.
काय सांगितलं होतं विजय वडेट्टीवार यांनी
राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार
तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर
चौथ्या टप्प्यातील 2 जिल्हे
पुणे, रायगड
पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु
- रेस्टॉरंट, मॉल्स
- गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील
- खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
- चित्रपट शूटिंगला परवानगी
- थिएटर सुरू होतील
- सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
- ई कॉमर्स सुरू राहिल
- जिम, सलून सुरू राहणार
- पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
- बस 100 टक्के क्षमतेने
- आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
- इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील
लेव्हल 1 – सर्व सुरळीत राहणार
लेव्हल 2 मधील जिल्ह्यात काय?
- 50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू
- मॉल्स, थिएटर्स 50 टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही
- सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील
- बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण
- ई सेवा पूर्ण
- जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू
- बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने
- जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल
लेव्हल 3 मधील जिल्ह्यात काय?
- अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत
- इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 ( शनिवार रविवार बंद)
मुंबई लोकलचं काय?
दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.