१९ लाभार्थ्यांना सातेरी पेटी व इतर साहित्यांचे वाटप
सातारा – दुष्काळ, अतिवृष्टी आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे वळले पाहिजे. मधचा व्यवसाय करून मध, मेण, रॉयल जेली आदीमुळे आर्थिक उन्नती साधता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाशी पालनातून मध्क्रांती घडवून आर्थिक सक्षम व्हावे, असे आवाहन वाघेश्वरी शेतकरी सहकारी कंपनीच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णया नुसार मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वाघेश्वरी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीने सातारा तालुक्यातील कास, सोनगाव, शेंद्रे, शेळकेवाडी, सातारा, बामणोली परिसर, लावंघर, करंडी, पिलाणी, कोडोली, जकातवाडी, किरोली, पुसेगाव तसेच महाबळेश्वर या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शेंद्रे येथे १० दिवसाचे मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात आले होते.
अजिंक्यतारा साखर कारखाना सातारा येथे मधकेंद्र योजने अंतर्गत १९ लाभार्थींना १९० सातेरी मधपेटया, मधयंञ १५, मध साठविनेसाठी २६ भांडी, लोखंडी स्टॅण्ड १८०, बी व्हेल १९, स्वार्म नेट १९ या साहित्याचे वाटप वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शेती पूरक व जोडधंदा रूपाने रोजगार निर्मितीसाठी मध व्यवसायाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मध योजना शेतकऱ्यासाठी फायदेशीर असून परागीकरणामुळे पीकांच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ होत असल्याचे मत दिग्विजय पाटील यांनी व्यक्त करून याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी मध संचालनालय महाबेश्वर येथील संचालक दिग्विजय पाटील, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक सयाजीराव तारे पाटील, अशोकराव पाटील, मध पर्यवेक्षक असोलकर, दिलीप साळुंखे, शिरसाट, बल्लाळ, वाघेश्वरी शेतकरी सहकारी कंपनीचे संतोष कदम व शेतकरी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी आभार मानले.