महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(इंदापूर )
योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत , म्हणून पुण्यातील एक तरूण पत्रकार पांडुरंग रायकरचा हाकनाक बळी गेला . पांडुरंगला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही, ऑक्सिजन मिळाला नाही , त्यामुळे एक तरूण पत्रकार आपणास सोडून गेला . व्यवस्थेच्या या गलथान कारभाराची आता चौकशी होणार आहे , तसे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत .
पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी आणखी एक भीषण वास्तव मान्य केलं आहे . श्रीमंत लोक दबाव आणून आयसीयूतील बेड अडवून ठेवतात . जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत .
माध्यमकर्मी हे कोरोना यौध्दे असतील तर त्यांच्यासाठी सरकारी आणि चॅरिटी कमिशनर अंतर्गत येणारे खासगी रुग्णालयात पत्रकारांसाठी ऑक्सिजनसह काही बेड राखीव ठेवले जावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे . कारण राज्यात आतापर्यंत किमान शंभरावर पत्रकार कोरोना बाधित झाले आहेत आणि मराठी पत्रकार परिषदेकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार अकरा पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे . सध्याच्या महामारीत योग्य वेळी योग्य उपचार मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे , पत्रकारांचा ही आहे , तो मिळत नसेल आणि केवळ गलथानपणामुळे पत्रकारांचे बळी जात असतील तर ते निषेधार्ह आहे .
पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे मात्र पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी , असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे .