महाराष्ट्र न्यूज/ म्हसवड प्रतिनिधी : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आपल्या गावाचा विकास आदर्शवत होण्यासाठी गावातील तरुणवर्ग व पर्यावरणप्रेमी यांनी संघटीत होऊन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे तसेच वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषिरत्न पुरस्कार प्राप्त प्रा.विश्वंभर बाबर यांनी देवापुर येथे केले.
देवापुर(ता.माण) येथे गावातील पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून वृक्षारोपण उपक्रम कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी बोलताना प्रा.बाबर म्हणाले गावातील ग्रामस्थांचे शारीरिक व मानसिक संतुलन आरोग्यदायी राखण्यासाठी व गावचे सौदर्य सुशोभित होण्यासाठी लोकसहभागातून आदर्शवत वृक्षारोपण उपक्रम घेणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही जरी काळाची गरज बनली असली तरी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन प्रा.बाबर यांनी केले. प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी वृक्षारोपणाचे महत्व व गरज याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. नुकत्याच झालेल्या वृक्षरोपणामधील सर्व वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी सरपंच शहाजी बाबर व त्याचे सर्व सदस्य यांनी घेतली असून आगामी काळात बहुसंख्य वृक्ष लागवड करण्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्याध्यापिका सुशीला बनसोडे यांना नवभारत नवराष्ट्र २०२१ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपणाच्या निमित्ताने गावात बॉटलपाम व फोस्टेलपाम या जातीची भव्य वृक्ष गावच्या दोन्ही स्वागत कमानी अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला व गावातील मुख्य परिसरात एकूण १५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, बी एन पवार, सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगल चव्हाण, ग्रामसेवक एस डी निकाळजे, तलाठी माधुरी चव्हाण, कृषिअधिकारी जयवंत लोखंडे, सुनील लोखंडे, पोपट बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, डॉ.पी एल सावंत, मधुकर कांबळे, डॉ.जयराज पवार, जगन्नाथ माने, किरण बाबर, आनंदा बाबर, विशाल जाधव, नितीन चव्हाण, शिवाजी जाधव, जिवा जाधव तसेच गावातील प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी,गावातील सर्व तरूणवर्ग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब बाबर यांनी केले तर आभार सागर बाबर यांनी मानले.