पाटण: अंधश्रद्धेने, मागासलेपणाने समाजाचे अतोनात नुकसान होत होते. शिक्षणा शिवाय समाज प्रगतीपथावर येऊ शकणार नाही हे ओळखून म. फुले व सावित्रीबाईंनी शिक्षणाचे काम सुरू केले, त्यामुळे भारतातील महिला शिक्षित झाल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई या खरोखरच भारतीय महिलांच्या स्फूर्तीस्थान आहेत, असे मत पाटण पंचायत समिती सदस्या सौ. उज्वला लोहार यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा ओबीसी महिला संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ओबीसी महिला संघटना अध्यक्ष सौ. सुनिता दीक्षित या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. उज्वला किसन गुरव, सौ. दीपाली संतोष लोहार, शांता जानकर, ऍड. स्वाती जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ.लोहार म्हणाल्या की, आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा ओबीसी महिला संघटना अध्यक्ष सौ. सुनिता दीक्षित
म्हणाल्या की, फुले दाम्पत्यांनी जुन्या, चालीरित्या व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले. समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दीपाली लोहार यांनी केले तर आभार प्रकाश लोहार यांनी मानले. यावेळी कविता ढवळे, लक्ष्मी कुंभार, किसन गुरव, प्रकाश लोहार, मधुकर लोहार हे उपस्थित होते.