कराड : खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासकामे पोहचवण्यासाठी कटिबद्ध असून त्यामुळे गत काही वर्षामध्ये रखडलेल्या कामांना पुन्हा चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील गारवडे, पाळेकरवाडी व हावळेवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सारंग पाटील म्हणाले, राजकारण आणि गावागावातील सर्वांगीण विकास ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. खा. श्रीनिवास पाटील यांनी विकासकामे करत असताना त्यामध्ये कधीही राजकारण बघितले नाही. आपल्या जवळ येणारा प्रत्येक नागरिक हा काही ना काही अडचण किंवा प्रश्न घेऊन येत असतो. अशावेळी त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याचे निराकरण करणे कर्तव्य मानले. तशी शिकवण त्यांनी आम्हालाही दिली आहे. आपल्यापरिने जे करता येईल ते करण्यासाठी व खा. पाटील यांच्या सूचनेनुसार गावभेट दौरा करत असून प्रत्यक्ष तळागाळातील नागरिकांशी संपर्क साधत आहे. त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहत आहे. खा.श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असल्यापासून विकासकामे गावोगावी पोहचली आहेत. सभामंडप, समाजमंदीर, रस्ते, पूल, गटर अशी असंख्य कामे आजही गावच्या वैभवात भर टाकत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरू आहे.
दरम्यान गारवडे, पाळेकरवाडी, हावळेवाडी येथील विकासकामाचे भूमिपूजन सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बहुलेच्या सरपंच सौ.सुजाता पवार, तुकाराम पाळेकर, हावळेवाडीचे सरपंच मनोज मोहिते, उपसरपंच दिलीप हावळे, जरेवाडीचे सरपंच भानुदास जरे, गारवडेचे हंबीरराव पाटील, संदीप पाटील, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.