दहिवडी : ता.०४
दहिवडीमध्ये शासकीय विश्रामगृहासमोर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा असून तो सध्या अंधारात आहे. जगाला ज्ञानप्रकाश देऊन अनेकांच्या घरात उजेड देणाऱ्या कर्मवीरांना अंधारात राहावे लागत असल्याने दहिवडीतील स्थानिक नागरिक आणि कर्मवीरप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दहिवडीजवळ असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन केंद्राजवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे छोटेसे स्मारक आहे. त्याचबरोबर दहिवडी गावात वास्तव्यास असल्याच्या नोंदी ही आज उपलब्ध आहेत. त्याच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे दहिवडीमध्ये रयत शैक्षणिक संकुल मोठ्या दिमाखात उभे असून या शैक्षणिक संकुलाचे मात्र कर्मवीरांकडे दुर्लक्ष आहे. या रयत शैक्षणिक संकुलामध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी, परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, रयत इंग्लिश मिडीयम स्कूल यांचा समावेश आहे. या संकुलात कर्मवीर अण्णांच्या कृपेमुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून या ठिकाणी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा उदरनिर्वाह ही त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. मात्र त्याच कर्मवीर अण्णांना रात्री अंधारात राहावे लागत असल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दहिवडी नगरपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा बल्ब लावून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उजेड दिला आहे, मात्र कर्मवीरांचे उपकार दहिवडीकर आणि नगरपंचायत प्रशासन विसरले असल्याची भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळेच कर्मवीर अण्णांना रात्री अंधारात राहावे लागत असल्याचे लोक बोलत आहेत. या एकंदरीत बाबीची दखल रयत शैक्षणिक संकुल आणि दहिवडी नगरपंचायत प्रशासन घेणार का? हे पाहणे दहिवडीकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया :
कर्मवीर अण्णा या दहिवडीत राहायला होते. त्यांच्या उपकारामुळे हजारो विद्यार्थी येथील रयत संकुलात शिकले आणि शिकत आहेत. त्यामुळे नगरपंचायत आणि रयत संकुलाने जगाला ज्ञानरूपी प्रकाशात आणून ठेवणाऱ्या कर्मवीरांच्या पुतळ्यासमोर लाईटची सोय करावी.
—- समीर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख(शिंदे गट)