महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्याय विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कार्यालयांच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तरीसुद्धा महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्यावर अन्याय सुरूच आहे. महावितरण कंपनीकडून होणारा शेतकऱ्यावर आणण्यात त्वरित थांबून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर संघटनेतर्फे फलटण येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. शेतातील शेती पंपास दिवसा १० तास लाईट मिळावी, मिटर रिडींग प्रमाणे शेतीपंपाचे योग्य पद्धतीने बिल दुरुस्त करून द्यावे, शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी, विज पुरेशा दाबाने मिळावी, शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे महावितरणचे खांब व रोहित्र आहेत, त्याचे वीज अधिनियमन 2003 नुसार मासिक भाडे मिळावे, वीज बिलाची पठाणी पद्धतीने होणारी वसुली थांबवावी, महावितरण कंपनीकडून शेतकरी वर्गाचे होणारे नुकसान भरपाई त्वरित मिळावी, ( उदा. शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटणे तसेच जनावरांना व माणसांना शॉक लागणे इत्यादीबाबतीत), फलटणच्या पूर्व भागात विशेषतः गोकळी, गुणवरे, मुंजवडी, बरड या भागात ८ तास ऐवजी ४ तास शेती पंपास वीज मिळत आहे, ती त्वरित पूर्ववत करावी, वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून संपूर्ण डीपी बंद केला जातो, त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास होत आहे, तो होता कामा नये, शेतकऱ्यांना शेती पंपाचे वीज बिल भरण्यास सुलभ हप्ते पाडून देण्यात यावेत आणि नादुरुस्त डीपी २४ तासांच्या आत बसून देण्यात याव्यात इत्यादी मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, युवक तालुका अध्यक्ष प्रमोद गाडे, पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव, फलटण शहर अध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपतालुका अध्यक्ष सहकील सिकंदर मणेर, उपतालुका अध्यक्ष निखिल नाळे, शंकरराव बोंद्रे, शशिकांत नाळे, जितेंद्र खानविलकर यांच्या सह्या आहेत.