महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. २९ मार्च : शालेय पोषण आहारासह अनेक समस्या शाळांना भेडसावत असताना एप्रिलअखेपर्यंत राज्यभरातील शाळा भरवायच्या कशा, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे. शासनाच्या परिपत्रकामुळे गोंधळ निर्माण होत असून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात य्र्त आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होण्यास उशीर झाला. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा एप्रिलअखेपर्यंत पूर्ण उपस्थितीसह सुरू ठेवण्याबाबत,तसेच एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात परीक्षा घेऊन मे मध्ये निकाल जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकामुळे गोंधळ निर्माण झाल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत भोजन मिळत नाही. विद्यार्थी उपाशी असताना त्यांना शाळेत बोलावले जात आहे. सरकार आणि शिक्षण विभागाचा इतका कोरडेपणा मुलांच्या बाबतीत योग्य नाही. तसेच अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधाही नाही. लोखंडी पत्र्याचे छत असलेल्या शाळांमध्ये उन्हाळय़ात बसणे शक्य होत नाही. शाळांमध्ये वीज, पंखे नाहीत. अनेक शाळांची वीज जोडणी तोडलेली आहे. अभावाचे दशावतार असताना शैक्षणिक नुकसान झाले म्हणून एप्रिल अखेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बसवणे योग्य नाही.