कोरेगाव (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात सलग अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन पाळल्यामुळे सामान्य नागरिकांसह रोजगार करणाऱ्यांवर मोठा परिणाम झाला असून या लॉकडाऊन काळातील घरगुती वापराचे वीज बील राज्य शासनाने माफ करावे अशी मागणी आज कोरेगाव शहरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे शासनाला केली आहे.
कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांना निवेदन देऊन वीज बील माफीसाठी शासनाचे लक्ष वेधले आहे.
सलग दोन, अडीच महिने कोणतेही उत्पन्न नाही, व्यवसाय ठप्प आहेत, सामान्य जनतेची आर्थिक कोंडी झालेली आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणी येत असताना कर्जाचे हप्ते, इतर देणी, बीले यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. यातून मार्ग निघण्याची शक्यता धूसर असताना राज्य शासनाने निदान या तीन महिन्यातील किमान २०० युनिट पर्यंत वापर असणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बील माफ करून सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
हे निवेदन सादर करताना माजी नगराध्यक्ष राजभाऊ बर्गे यांच्या समवेत नाना शिंदे, किशोर चिनके, अजित पवार, श्री. आचार्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते.