मोदींचा मोफत धान्याचा निर्णय स्वागतार्ह!
इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक.
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी सौरभ सुतार,
कोरोना संसर्गाचे इंदापूर शहर,जंक्शन येथे आज बुधवारी (दि.1) रुग्ण सापडले आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा काळजी करणारा आहे. जनतेमध्ये अलीकडच्या काळात अनलॉकच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणा वाढल्याचे चित्र दिसून आहे. त्यामुळे आणखी संसर्ग वाढू नये म्हणून जनतेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना गंभीरपणे सजगता बाळगावी,असे आवाहन माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.
जनतेने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे घाबरून जाऊ नये,मात्र सध्या ‘अनलॉक ‘ची प्रक्रिया चालू झाल्याने जनतेने अधिकची जागृतता दाखविणे आवश्यक आहे. जनतेने सहकार्य केल्यास इंदापूर तालुका निश्चितपणे कोरोना मुक्त राहील,असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा.यामध्ये अपराधीपणाची, कमीपणाची भावना बाळगण्याची आवश्यकता नाही,उलट हे प्रशासनास सहकार्याचे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे चांगले काम आहे. नागरिकांनी शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा कोरोनाला हरविण्याचा सध्याचा प्रभावी मार्ग आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार मार्फत देशातील 80 कोटी जनतेला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 महिने प्रतिमहिना व प्रतिमाणसी 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबास 1 किलो डाळ मोफत देण्याचा घेतलेला निर्णय सध्याच्या कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या जनतेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय स्वागतार्ह आहे, असे मतही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयामुळे जनतेला अडचणीच्या काळात मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.























