महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील सोमवारी सायंकाळ पर्यंत ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला असून सध्या खडकवासला धरणातून ९४१६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे, तर पानशेत धरणातून खडकवासला धरणात२००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण २५.८२ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ८८.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या परिसरात ३ ऑगस्ट पासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम आहे. परिणामी खडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरणही सोमवारी सायंकाळी १०० टक्के भरले. तर, वरसगाव धरण ८५ टक्के भरले असून धरण क्षेत्रात दमदार पाऊस कायम राहिल्यास हे धरण मंगळवापर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली. टेमघर धरण ६८ टक्के एवढे भरले आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांमध्ये
टेमघर २.५१ (६७.८१), वरसगाव १०.८१ (८४.२९), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), पवना ६.१७ (७२.५४), डिंभे ८.९६ (७१.७२), चासकमान ४.८३ (६३.७४), भामा आसखेड ५.४६ (७१.२६), गुंजवणी ३.५१ (९५.२१), निरा देवघर ९.६३ (८२.१३), भाटघर २१.८४ (९२.९२), वीर ८.६७ (९२.१४) आणि उजनी २६.६४ (४९.७२)




















