सातारा, दिनांक 28: कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब ,माझी जबाबदारी’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला असून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत.या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने एका पत्रकाद्वारे केले आहे.याबाबत अधिक माहिती देताना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
त्यासाठी शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक तसेच स्वयंसेवक अशा घटकांची टीम तयार करून अशी टीम घरोघरी भेटी देत आहे.कुटुंबातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.एक टीम रोज पन्नास घरांना भेटी देत असून त्याबाबत तातडीने रिपोर्टिंग केले जात आहे.नागरिकांनी याबाबत सहकार्य केल्यास ही मोहीम नक्कीच यशस्वी होणार आहे, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की नागरिकांनी या व्यापक मोहिमेला पाठिंबा देत असतानाच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घ्यावी.नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रशासनाला बळ मिळते.
जीवाची पर्वा न करता कर्मचारी सर्व भागात घरोघरी फिरत आहेत.त्यामुळे कर्मचार्यांना सहकार्य करून आपला मोलाचा वाटा जनतेने उचलावा.सामाजिक अंतर, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे ही यशाची त्रिसूत्री जनतेने अवलंबली पाहिजे.तसेच आयुष मंत्रालयाने सुचवलेले घरगुती उपाय न थकता अविरतपणे चालू ठेवले पाहिजेत.घरात आणि गावामध्ये आजूबाजूला काटेकोर स्वच्छता ठेवायला हवी.असे देखील पुढे या पत्रकात म्हटले आहे.