महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा : सातारा शहरात अतिक्रमण म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. अनेकवेळा तक्रारी करून कुठेतरी नाममात्र कारवाई केल्याच्या गोष्टी ऐकावयास मिळतात. तर काही ठिकाणी वशिलेबाजी किंवा मेहेरबानांच्या वरदहस्ताने कारवाईच होत नाही. त्यामुळे साताऱ्यातील अतिक्रमणाचे पाळेमुळे दिवसेंदिवस वाढतच आहे.
शहरातील शाहूनगर परिसर हा नगररचनेनुसार शिस्तबद्ध असल्याचा उल्लेख केला जातो. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यातून शाहूनगर देखील सुटला नाही. येथील रस्ता नगररचना विभागाच्या नोंदीत १५ मीटर रुंदी असला तरी प्रत्यक्षात २० फुटाचा देखील रस्ता उरला नाही, असे मत येथील नागरिकांनी बोलून दाखविले आहे.
मोनार्क हॉटेलपासून लोखंडी गिरणी पर्यंतच्या रस्त्याने गेल्यास येथील वाढलेल्या अतिक्रमणाचा अंदाज येतोय. नगरपालिकेकडे या संदर्भात अनेक तक्रारी दिल्या असतानादेखील आतापर्यंत येथे कोणतीही कारवाई झाली नाही. याचाच फायदा घेऊन आता याच परिसरात पूर्वीचे अतिक्रमण झाकण्यासाठी देवाच्या नावाखाली अतिक्रमणाचा पुढचा पाया खोदला जात आहे. सध्या ज्या जागेत मंदिर बांधण्यात येत आहे, त्याच्या पाठीमागे असलेले बांधकाम देखील अतिक्रमणाच्या असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचं आणखी अतिक्रमण करण्याचं प्रोत्साहन नगरपालिकेकडून होत आहे का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकाराकडे नगरसेवक आणि संबंधित विभागाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.