विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही . तो परत समशानात गेला . त्याने वेताळ असलेले , झाडाला लटकलेले प्रेत खांद्यावर घेतले . आणि तो चालू लागला . प्रेताला आता वाईट वास येऊ लागला होता . अनायासे मास्क तोंडाला असल्याने विक्रमादित्याला ती दुर्गंधी थोडी सुसह्य झाली . वेताळ गोष्ट सांगायला, आणि डोक्याच्या शंभर शकलां ची धमकी द्यायला सुरवात करणार, इतक्यात विक्रमादित्यानेच,
” थांब वेताळा , आज मी च तुला गोष्ट सांगून प्रश्न विचारणार आहे . आणि तू उत्तरे देऊ शकला नाहीस, तर तुला ऑक्सीजन मिळणार नाही . रेमडेसिवीरची इंजेक्शन्स मिळणार नाहीत . तुला लस उपलब्ध होणार नाही . आणि तू च तडफडून गुदमरून मरशील .”
निर्लज्ज आणि दांभिका ला कोण मारणार ? विच्चार तुला काय विचारायचे ते !” वेताळ गुर्मीत बोलला .
तर ऐक, असे म्हणत विक्रमादित्याने गोष्ट विचारायला सुरुवात केली .
प्राप्त परिस्थितीत हिंदुस्थान नावच्या देशात कुणा परगण्यात , आटपाट नगरात, खुशाल सिंह म्हणून एक नागरीक राहात होता . बेदरकार, उद्धट, दांभिक . त्याच्या राज्यात , काळजीने , त्या राज्याच्या प्रमुखाने मास्क, हात सफाई, आणि दो गज दुंरी चा फतवा काढला . त्याकडे कानाडोळा करून , खुशाल , अगदी खुश्शाल बोंबट्या मारत फिरायला बाहेर पडला . त्याने मुखलंगोट परिधान केला नाही . रस्त्यावर पचापचा थुंकला . गर्दी जमा केली . मग कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेने त्याचे बूड सुजवले . आणि वर दंड ही केला . तरीपण दुसऱ्या दिवशी खुशाल परत बोंबट्या मारत फिरायला बाहेर पडला .
अशी माणसे असे वारंवार का करतात ? त्यांना जबाबदारीचे भान का नसते ? कायद्याला ते का घाबरत नाहीत ? मोठ्या मोठ्या सभांना , लग्न समारंभांना , इ . ते गर्दी का करतात ? हॅ , मला काय होत नाही , ही मस्ती त्यांचे अंगात कुठून येते ? वेताळा, तू जर समर्पक उत्तर दिले नाहीस, तर ……!”
घाबरून वेताळाने उत्तर द्यायला सुरुवात केली .
“ही माणसे बारुळी असतात . त्यांना अक्कल शुन्य असते किंवा ती बेजबाबदार असतात . इतरांच्या जिवाची तर त्यांना अजिबात पर्वा नसते . भंपक आत्मविश्वास असतो स्वतःबद्दल . व्हॉट्सॲप सारख्या माध्यमांवर यांचा अंधश्रध्देच्याही पलीकडे विश्वास असतो .”
प्रश्न विचारण्या पलीकडे फारसे डोके चालवण्याची अक्कल नसलेल्या वेताळाला , ग्लानी आली .
विक्रमादित्य खदा खदा हसू लागला . आणि म्हणाला,
” आता मर, तू ज्या प्रेतात राहून लटकला आहेस, त्याला कोरोनाने विळखा घातला होता ! हिय्या !”
असे म्हणून विक्रमादित्याने खांद्यावरून ते प्रेत खाली फेकून दिले . आणि तो राजवाड्या कडे “हुश्श” म्हणत दिमाखाने चालू लागला .
” ओय, ओय अरे मला हॉस्पीटलात दाखल कर रे ! ” असा गयावया करणारा आवाज त्याला बराच लांबपर्यंत ऐकू येत होता .
दिपक दी . डी . एस .
सातारा