मधुसूदन पतकी
सातारा जिल्हा कोरोनाचा धगधगता बिंदू झाला आहे. बाधित,मृत्यूचे प्रमाण भयावह आहे.लॉकडाऊन, कडक लॉकडा ऊन सगळे प्रकार करून झाले. करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न झाले.साखळी तुटली नाही. त्याची कारणे पाहता येतील.मात्र ती साखळी मधल्या काळात भक्कम झालेली दिसते.खरे तर आपल्या वर्तनानी जिल्ह्यातली कोरोना साखळी आपण भक्कम केली की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.आता ही साखळी तोडायला दादा कशाला पाहिजेत.आणि आपलं वागणं तसंच राहिलं तर दादा तरी काय करणार?तात्पर्य कोरोना किंवा कोविड नियंत्रणात आणणं केवळ आपल्या आणि आपल्याच हातात आहे .शासनाची कामे,प्रशासनाची कामे,शासन-प्रशासन समन्वयातून केली जाणारी कामे आणि आपली जबाबदारी या चतु:सूत्रीतून कोविडवर आपण मात करू शकतो.शासन म्हणजे लोकप्रतिनिधी.जनतेतून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडून गेलेले प्रतिनिधी.ते कायदे,धोरण तयार करण्यास सक्षम असतात.तयार करतात.प्रशासन;शासनाचे निर्णय ,कायदे ,धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी असतं.ही एक यंत्रणा आहे. या दोन्ही व्यवस्थांची तोंडे एकाच दिशेला पाहिजेत.गती समान पाहिजे.विचारसरणी एकच हवी. मात्र दुर्दैवाने महामारीच्या काळात हे होताना दिसत नाही.
दिवसेंदिवस शासन,प्रशासनाने स्वयंनियंत्रित कार्यपद्धती निर्माण केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.त्याची महत्त्वाची कारणे सहज लक्षात येतात.
त्यात नियोजन अपुरे,नाही, किंवा आयोग्य आहे.पुरेशी यंत्रणा नाही. मानवीशक्ती,उपकरणे,यंत्रसाहित्य किंवा आवश्यक सोयीसुविधा या ही नाहीत. सहाजिकच या अपुरेपणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही.आम्ही सांगतो, आम्ही आम्हाला सांगितले तसे वागतो या शासन व प्रशासनाच्या वर्तनामुळे सामान्य माणसांनी; ज्यांना निवडून दिले,ज्यांच्यासाठी यंत्रणा आहे अशी सामान्य मंडळी हकनाक मरत आहेत.बाधित होत आहेत.आर्थिक,मानसिक, शारीरिक विवंचनेत आहेत.
ही महामारी आहे.जागतिक संकट आहे.एक महिना,दोन,तीन,चार महिन्यात हे संकट संपणार नाही याची रास्त जाणीव आता बहुतेक सगळ्यांनाच झालेली आहे.त्यावर उपाय काढणे,त्यातून मार्ग काढणे ही यापुढील काळाची तीव्र गरज आहे.या गरजेचा विचार;त्यावर कृती होईल का हा साधा प्रश्न आज आहे. आपल्या देशाचा,राज्याचा नव्हे आपला जिल्ह्याचा पोत विविधतेचा म्हणजेच एकजिनसीपणाचा नाही.सहाजिकच मानसिकता,अर्थकारण,समाजकारण यामध्ये भिन्नता आहे.एक निर्णय सगळ्यांना लागू होणार नाही. मग यथायोग्य निर्णयाच्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत.कृतीशीलता व निर्णय एकमेकांवर ढकलण्यात अर्थ नाही.लॉकडाऊन हा असाच निर्णय. हा निर्णय सरधोपट पण दीर्घकालीन परिणाम करणारा. हा उपाय वारंवार अमलात आणणे अयोग्य आहे.औषधांच्या,लसींच्या वापर,वितरण,किमती पासून वापरा पर्यंत सावळे गोंधळ दिसले.लोकांनी अनुभवले.औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी नियमांची रचना केली.पण प्रामाणिकपणे सांगावे;औषधांचा काळाबाजार या नियमांमुळे झालाच नाही .ऑक्सीजन बेडचे भाडे अव्वाच्यासव्वा हे आकारले गेलेच नाही.हे शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना माहिती नाही हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे.उद्या ही महामारी संपेल पण सर्वसामान्यांच्या मनात शासन-प्रशासन त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसायाबद्दल जी प्रतिमा निर्माण होत आहे ती पुसली जाणार आहे का हाही प्रश्न आहे. सातार्यासारख्या लहान गावात यापुढे आपण एकमेकां पुढे येणार आहोत आणि कोणी काय केले हेही समजणार आहे. तेंव्हा या सगळ्यातून शासन, प्रशासनाने शहाणं होणे अपेक्षित आहे.जे आज होत नाही असं दिसतंय.हात धुणे,एकमेकात अंतर ठेवणे आणि मास्क लावणे ही निरंतर प्रक्रिया करत राहावी लागणार आहे.संयम आणि शांततेत व्यवहार करायची सवय अंगी बाणवावी लागणार आहे. भाजी घ्या.पण भाजीच्या टोपली भोवती कोंडाळ करायला नको याचे भान आतातरी आपल्या यायला पाहिजे.हीच परिस्थिती दुकाने,बँका,दवाखाने अशा ठिकाणी ठेवावी लागेल.
खरंतर आजची परिस्थिती ‘एक अनार और बीमार’अशी आहे अशा परिस्थितीत दादा,साहेब आणि कोणी साताऱ्यात येऊन काय करणार असा प्रश्न निर्माण होतो. उलट त्यांच्या दिमतीला आणि त्यांच्यासाठी धावपळीला यंत्रणा विनाकारण कामाला लागते. त्यातून धोरण,नियम ठरलेले आहेत.मात्र अंमलबजावणी दुसऱ्याच्या हातात असेल तर अशी धोरणे कागदोपत्रीच उतरतील. धोरण करणारे,अंमलबजावणी करणारे व अंमलबजावणी ज्यांच्यासाठी केली जाते अशा तिघांनी एकत्र येऊन यापुढे प्रश्न सोडवावे लागतील.वैयक्तिक पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींनी उत्तम काम केले आहे.जिल्ह्यातही अशी अनेक उदाहरणे आहेत.त्यांचे अभिनंदनच.!मात्र खंत एकच आहे.प्रशासनासोबत हे काम होताना दिसत नाही.
कायद्याचे पालन सारासार विचार,विवेक याने करावी लागेल. ही मूलभूत जाणीव अजून आपल्यात निर्माण झालेली नाही. या सगळ्याचा विचार करून शासन,प्रशासनाने सध्याच्या वास्तवाचे नियोजन केले पाहिजे. आपल्याला अजून काही महिने कोविडशी लढायचे आहे. हाताशा, कंटाळा,नैराश्य, निरुत्साह टाळून आपल्याला याविरोधात विरोधात लढण्याची मानसिकता निर्माण करावी लागणार आहे. यासाठी उपक्रमशीलता,नाविन्य, लोकसहभाग,सर्वसमावेषक समन्वय आणि महत्त्वाचं म्हणजे सारासार विचार या बरोबर निर्णय घेण्याची व त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली पाहिजे.त्याच बरोबर सर्वसामान्यांनीही आपलं उत्तरदायित्व सांभाळलं पाहिजे. आता मुद्दा येतो तो दादा कशाला पाहिजेत या प्रश्नाचा.मुळात पुण्याची परिस्थिती भयावह होती. साताऱ्यातील दहा घरांपैकी तीन ते चार घरे पुण्याची थेट संबंधित आहेत.दादांनी किंवा सातारचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येऊन नियोजन करायला पाहिजे होते. पुण्यात कोविडची लागलेली आग इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीमुळे व सातारा जिल्ह्यात लागलेली आग पुण्यातून स्वगृही आलेल्या व्यक्तीमुळे जास्त भडकल्याची एक शक्यता व्यक्त होते.अशा परिस्थितीत दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी,सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख यांची नियोजन बैठक, त्यानंतर पाठपुरावा,आढावा बैठका झाल्या का?त्यात काय ठरले?याच्या प्रतीक्षेत गरीब बिचारी जनता आहे.
दादांना सातारा सांभाळा म्हणून विनंती करताना एक तर आपल्या शासन,प्रशासनावरचा विश्वास आपला उडाला आहे हे अधोरेखित होत आहे. तसेच हे शासन प्रशासनालाही मान्य होते आहे. दुसरे म्हणजे दादांना पुणे सांभाळणे हे मोठे उद्दिष्ट आहे. त्यापुढे विभाग मग अख्खा महाराष्ट्र.अशीच परिस्थिती आरोग्यमंत्र्यांची.चार तासाच्या झाडा-झडतीत प्रशासकीय यंत्रणा कशी कार्यक्षम करणार? मुळात ती अकार्यक्षम आहे हे आपण मान्य करतो हेच मला मान्य नाही. त्यामुळे यापुढे तिसरी लाट येणार आहे त्याची तयारी आपण कशी करणार?मुळात तिसरी लाट हे भय निर्माण करायचे विषाणू पसरवायचे की प्रतिबंधात्मक उपाय योजना निर्माण करायची याबाबतही विचार व कृती व्हायला पाहिजे.
तुर्तास:कोंबडा कोणाचाही असो तो आखून पहाट होणे आवश्यक आहे.
.
मधुसूदन पतकी