तुर्तास बास..!
मधुसूदन पतकी
वृत्त संपादक
महाराष्ट्र न्यूज
श्री. शरद पवार निवडणुकीची तयारी करत आहेत ते क्रमांक एक लोकसभेची आणि क्रमांक दोन मुदतपूर्व किंवा मध्यावधी विधानसभा निवडणुकीची. लोकसभेची निवडणूक किमान पंधरा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन लढवायची, ती जिंकायची, पाच वर्ष पंतप्रधान म्हणून काम करायचे हे सोपे उद्दिष्ट नाही.
प्रादेशिक पक्ष एकत्र करून दिल्लीचे सिंहासन मिळवायचा हा या लेखाचा तिसरा मुद्दा. आता तिसरी आघाडी करून पर्याय निर्माण करणे हा या स्थितीत चौथा प्रयत्न होणार आहे. सध्या ही तिसरी आघाडी आहे की नाही याबाबत श्री.शरद पवार स्पष्ट काही सांगतील असं वाटत नाही. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पर्याय देणे हे प्रादेशिक पक्ष एकत्र जमून, त्यांना विरोधात उभे करण्याचे तंत्र सध्या श्री. पवार सकृतदर्शनी अवलंबत असले तरी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय केंद्रात त्यांना सत्तेत सहभागी किंवा सत्ता मिळवता येणार नाही; हे त्यांना नक्की माहिती आहे .काँग्रेस शिवाय श्री. पवार ;निर्माण करण्याच्या बेतात असलेली ही तिसरी आघाडी असेल .काँग्रेसचा या आघाडीत प्रवेश बहुधा नसेल. तिसऱ्या आघाडीच्या वतिने भविष्यात शिष्टाई करण्याचे धोरण अवलंबण्याचे अधिकार, स्वातंत्र्य श्री. पवार यांच्या जवळच असेल. किंबहुना तेच स्वतःकडे ठेवण्याचा त्यांचा मानस असेल. आता प्रश्न निर्माण होतो की, असे प्रादेशिक पक्ष एकत्र घेऊन राष्ट्रवादी अध्यक्ष श्री. पवार तिसरी आघाडी निर्माण करत असतील तर सध्याच्या यूपीए म्हणून असलेल्या आघाडीत कोणते पक्ष असतील ?थोडक्यात यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) अस्तित्व धोक्यात आणणारी ही तिसरी आघाडी असेल. आणि काँग्रेसला निदान महाराष्ट्रात तरी ती परवडणारी असेल का, मान्य असेल का हा प्रश्न आहे.
*प्रश्न विश्वासाचा*
चौथा महत्त्वाचा मुद्दा असा की, श्री. शरद पवार हे मातब्बर नेते आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. राजकारणात योग्य संधीचा फायदा घेण्याची जी क्षमता त्यांच्याकडे आहे ,तसेच अडचणीत संधी निर्माण करण्याचीही क्षमता त्यांच्याकडे आहे. या गुणामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे .असे असताना शरद पवार तिसऱ्या आघाडीचा प्रादेशिक पक्ष एकत्र करून जो प्रयोग करत आहेत तो केवळ भाजपपुढे आव्हान नाही तर काँग्रेस पुढेही आव्हान असेल. किंवा कळत नकळत ते आव्हान देत असतील .अर्थात श्री. पवार यांच्या संदर्भात कळत-नकळत हा विषय असू शकत नाही. तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी पुढे, विशेषतः काँग्रेसपुढे असे आव्हान उभे केल्यामुळे इथल्या आघाडीच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लागू शकते. या प्रश्नातून राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार असतील तर त्याची संभाव्यता विचारात घेऊन श्री. शरद पवार दोन्ही निवडणुकांची तयारी करत असतील. तिसऱ्या आघाडीची निर्मिती याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला आव्हान असे असेही होऊ शकते. समजा लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप व पुन्हा सत्तेत आला तर या प्रबळ विरोधी पक्षनेतेपदी आणि राज्याच्या राजकारणावर हुकूमत ठेवण्यासाठी तिसरी आघाडी आपल्याच ताब्यात राहावी असेच त्यांचे प्रयत्न असतील. आणि त्यापुढे तिसरी आघाडी म्हणून विरोधकच नव्हे तर आतून ,बाहेरून पाठिंबा देण्याची वेळ आली तर केंद्राच्या सत्तेत सहभागी होण्याचा त्यांचा मार्गही रिकामा असेल . त्या प्रकारात तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगात चित भी मेरी अभी मेरा या परिस्थितीत श्री. शरद पवार असतील. हा हेतु सुद्धा श्री. पवार यांचा असू शकतो.अर्थात तिसरी आघाडी स्थापन करणे आणि काँग्रेस पुढेही आव्हान उभे करणे यामुळे श्री.पवार यांच्यावर असणाऱ्या काँग्रेसच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. श्री. शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत यामागे त्यांच्यावर किती व कसा विश्वास ठेवायचा आणि अवलंबून राहायचे याचा विचार केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षही नक्कीच करत असतील हे करण आहे.
*उद्दिष्ट सत्ताच.!*
सत्ते करता कोणी कोणाचे दीर्घकाळ शत्रू असत नाही ,किंवा मित्रही नसतो. हिंदुत्व, काँग्रेस विरोधात असलेली तत्वे या वर झालेली भाजप-सेनेची युती सत्ते करताच संपली. आता शिवसेनेची दोन्ही काँग्रेसशी जी हातमिळवणी झाली आहे ,ती सत्ते करताच झाली आहे. पुन्हा सत्ते करतात हात मिळून वेगवेगळ्या हातांशी मिळवणीचा ही प्रायोग होऊन शकतो. याला प्रयोगशील राजकारण; असा स्वतःच्या कौतुकाची थाप पण मारून घेता येईल. यावर भाजपकडे किंवा काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांकडे एकच पर्याय उरतो ,तो म्हणजे निर्विवादपणे स्वबळावर सत्ता मिळवणे. व्यवसायिक राजकारण करण्यापेक्षा राजकारणात व्यवसायिक वृत्ती आणणे हे आवश्यक आहे. आता तत्व संपलेल्या राजकारणात सत्ता मिळणे, मिळवणे हे ध्येय-धोरण आणि उद्दिष्ट ठरल्याने आता श्री. प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यवसायिक राजकारण घडवणाऱ्यांचीच चलती राहील. जाता जाता एक टिप्पणी करावीशी वाटते. पूर्वी राजकारण, समाजकारण जिवलग, प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवावर चालायचे .आता ते तसे चालणार नाही ,तर डावपेच शिकवणाऱ्यांच्या सल्यानी, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या वापर करुन घेण्यावर चालणार आहे. तेव्हा तूर्तास बास..!
.
मधुसूदन पतकी
(उत्तरार्ध)