सातारा : सध्याच्या काळात शेती बेभरवश्याची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकत असतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत अशा भागामध्ये शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे अधिक असतो. तसेच बरेच शेतकरी आले, हळद, भाजीपाला, फुलेपिके यासारख्या नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु बाजारातील दरांच्या अनिश्चीततेमुळे योग्य दर मिळण्यास अडचणी येतात. या परिस्थितीमध्ये भात, ज्वारी यासारख्या धान्यपिकाकडे शेतकऱ्याचे दुर्लक्ष होत आहे, परिणामी या पिकाखालील क्षेत्र व उत्पादन घटलेले दिसुन येते मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या मागील वर्षीच्या रब्बी हंगाम पिक स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने विकसित केलेल्या ज्वारीच्या सुधारित फुले रेवती वाणाने विक्रमी उत्पन्नाची नोंद घेत. राज्यात सरशी मारली आहे. राहुरी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे सुधारित वाण हे जमिनीच्या प्रतवारीनुसार वापरण्याची शिफारस केलेली आहे.
यामध्ये भारी जमिनीसाठी फुले रेवती व वसुधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा व चित्रा तसेच हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली हुरडयासाठी फुले मधुर, लाहयांसाठी फुले पंचमी यासारखे सुधारित वाण विकसित केलेले आहेत. शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयात विक्री केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. यापैकी सातारा जिल्हयात कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. सन 2020-21 रब्बी हंगामात वर्षी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात आलेल्या पिक प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांना बोरगांव केंद्रामार्फत फुले रेवती या वाणाचे बियाणे तसेच बिजप्रक्रियेसाठी जिवाणु खते वितरीत करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे पिक उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी माहितीपत्रके पुरविण्यात आली.
शेतकऱ्यांना बियाणे पेरणीपासुन काढणीपर्यंत पिक वाढीच्या अवस्थेनुसार कृषि विभागाच्या सहयोगाने प्रशिक्षणे, शेतीशाळा, कृति प्रात्यक्षिके, शास्त्रज्ञ भेटी यामाध्यमातुन मार्गदर्शन करण्यात आले होते. कोरोना साथीमुळे टाळेबंदीच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ऑनलाईन माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी सातत्याने चर्चासत्रे आयोजित केली जातात. यामाध्यमातुन राहुरी कृषि विद्यापीठाचे मा. कुलगूरु डॉ. पी. जी. पाटील तसेच मा. संचालक, विस्तार शिक्षण डॉ. एस. आर. गडाख तसेच विविध पिकांचे पैदासकार शास्त्रज्ञ यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधुन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रेरीत केले आहे. यासर्व प्रयत्नानां शेतकऱ्यांची योग्य साथ मिळाल्यामुळे जावली सारख्या दुर्गम भागातील प्रगतशील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे रा. सोनगांव यांनी हेक्टरी 101 क्विंटल इतके उच्चांकी उत्पादन घेऊन राज्यात रब्बी ज्वारी पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तसेच वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील युवा शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. फुले रेवती हा वाण बागायती क्षेत्रामध्ये खतांना चांगला प्रतिसाद देतो. ज्वारी वर येणाऱ्या खोडमाशी व खडखडया यासारख्या किड व रोगांना प्रतिकारक्षम वाण आहे. फुले रेवती वाणाच्या भाकरी व कडब्याची चव पारंपारीक मालदांडी सारख्या वाणाप्रमाणेच असल्यामुळे हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेला आहे.
सातारा जिल्हयामध्ये हवामानारुप विविधता असल्यामुळे बागायती, जिरायती, भाजीपाला, फुलपिके तसेच स्ट्रॉबेरीसारखी वैशिष्टयपुर्ण पिके घेतली जातात. यासर्व पिकांकरीता म.फु.कृ.वि. राहुरी मार्फत विकसित नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आद्यरेखा प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, कृषि विभाग तसेच फेसबुक, युटयुब यासारखी समाज माध्यमे तसेच वर्तमानपत्रे, मासिके व आकाशवाणी, दुरदर्शन यासारख्या प्रसार माध्यमातुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित असतात. शेती शाश्वत, किफायती, फायदेशीर होण्यासाठी ग्रामीण युवक, महिला, शेतकरी स्वयंसहाय्यता व बचत गट यांच्यासाठी गरजेनुरुप विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव यांच्या माध्यमातुन राहुरी कृषि विद्यापीठाच्या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन विद्यापीठाचे मा. कुलगूरु डॉ. पी. जी. पाटील तसेच मा. संचालक, विस्तार शिक्षण डॉ. एस. आर. गडाख यांनी केले आहे.