म्हसवड प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितेचं सावट आलं आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करणार याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. हजारो लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र जमतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण कसा साजरा होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन म्हसवड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी गणेशोत्सव मंडळातील व परिसरातील नागरिकांसाठी ठेवण्यात आलेल्या बैठकीत केले, ते म्हसवड पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलत होते.
बैठकीत बोलताना सपोनि ढेकळे म्हणाले की भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.
गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.
आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची दररोजची संख्या पाहता व सध्या केरळ राज्यातील ओणम सणामध्ये झालेल्या गर्दीमुळे कोरानाची वाढलेली रुग्ण संख्या पाहता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार व मा.जिल्हाधिकारी आदेशानुसार सर्व मंडळांनी सुचनांचे पालन करावे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट व त्यामध्ये मुलांना जास्त धोका असल्याचे तज्ञाचे मत पाहता प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती साठी प्रयत्न करावा. सर्व गणेशोत्सव मंडळांनी पोलीस परवानगीकरिता ऑनलाइन अर्ज भरावा, तसेच संबधित ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला घेणे बंधनकारक राहील. शासनाचे आदेशाप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती ही 4 फुटापेक्षा मोठी नसावी, व घरगुती गणपती 2 फुटाचा असणे आवश्यक आहे. गणपती मंडपामध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. गणेशोत्सव मध्ये आगमन व विसर्जनाला मिरवणुकीस परवानगी नाही. डिजे, डॉल्बी, बॅन्जो इत्यादीला परवानगी असणार नाही. श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून गर्दी टाळावी. गणेश उत्सव काळात सांस्कृतीक कार्यक्रम परवानगी नाही त्याऐवजी आरोग्य विषयक शिबीर, रक्तदान, डेग्यु व इतर आजार पाहता स्वच्छता मोहीम राबविणे, प्रत्येक मंडळाने झाडे लावणे उपक्रम राबवावा. गर्दी होईल असे गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, अन्नदान, महाप्रसाद इ. कार्यक्रम परवानगी नाही. कृपया कोरोनाच्या तिसरे लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वानी वरील सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. जे गणेश मंडळ शासन आदेशांचे पालन करणार नाहीत त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन बाजीराव ढेकळे यांनी केल.