महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. १५ एप्रिल : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. आंबेडकर हे त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले.
पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि कांताबेन जे. पी. महेता ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य वाळवेकर बोलत होते.
यावेळी प्राचार्य वाळवेकर आणि मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले.
प्राचार्य वाळवेकर पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्तम
राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सूत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. डॉ. आंबेडकर यांच्या समता – बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सुत्रंविषयी जागरूक राहावे लागेल, हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ठरेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शैलजा पाटील यांनी केले, तर प्रा. एम. ए. पवार आणि प्रा. रेखा वाडकर यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.
भगवानसिंग राजपूत यांनी केले तर प्रा. प्रवीण कदम यांनी आभार मानले.