श्रमिक मुक्तीदलाच्या लढ्याला यशअजितदादांच्या हस्ते कोयना धरणग्रस्तांना होणार जमिनीचे वाटप : चैतन्य दळवी
पाटण,प्रतिनिधी: श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या कोयना धरणग्रस्त बाधित जनतेच्या पुर्नवसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश मिळाले आहे. कोयना धरणाच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार दि. 16 रोजी कोयनानगर येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते, श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपाचा शुभारंभ व प्रकल्पग्रस्तांची भव्य परिषद आयोजित केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे युवा आघाडी प्रमुख चैतन्य दळवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.दरम्यान, येत्या वर्षभरात कोयना धरणग्रस्तांच्या शंभर टक्के पुर्नवसनासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत व ताकद वापरू, असेही चैतन्य दळवी यांनी बोलताना सांगितले.पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रमिकचे सचिन कदम, बळीराम कदम, महेश शेलार, श्रीपती माने, रमेश जाधव, सीताराम पवार, विनायक शेलार आदी उपस्थित होते.चैतन्य दळवी पुढे म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, जमिनी देवून सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्तांना शतकों शतकेन्याय हक्कासाठी शासनापुढे झोळी पसरावी लागत होती. ज्यांच्या जमिनींमुळे कोयना प्रकल्प उभा राहिला, ज्या धरणामुळे महाराष्ट्र हिरवागार झाला, ज्यांनी त्याग केला ते न्यायाच्या प्रतिक्षेत होते. 65 वर्षानंतरही ना जमीन, ना पाणी, ना नोकरी, ना वीज अशी बिकट अवस्था धरणग्रस्तांची झाली होती. ज्यांनी देशासाठी, राज्यासाठी त्याग केला त्या भूमिहीन पुत्रांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्षच झाले होते. धरणग्रस्तांची चौथी पिढी न्यायासाठी झगडत होतीकोयना धरणग्रस्तांच्या नशिबी फक्त विवंचना आणि अवहेलनाच असल्याची भावना प्रकल्पग्रस्त जनतेमधून व्यक्त केली जात होती. धरणग्रस्तांनी जमिनी दिल्यानंतर 1960 साली कोयना धरण झाले. त्यातून धरणग्रस्त सावरतोय तोपर्यंत 1967 साली प्रलयंकारी भूकंप झाला. त्यातूनही सावरतोय तोपर्यंत अभयारण्य व आता व्याघ्र प्रकल्प धरणग्रस्तांवर लादला गेला. राज्याला औद्योगिक आणि शेतीत प्रगतीपथावर नेणाऱ्या कोयना धरणाला ज्यांनी जमिनी दिल्या त्याला जवळ जवळ 65 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांची आजपर्यंत केवळ उपेक्षाच झाली होती.श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाने कोयनानगरमध्ये नदीकाठावर कसलीही तमा न बाळगता लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वच धरणग्रस्तांनी उपयोगी सर्व साहित्यांसह आपला ठिय्या मांडला होता. अनेक मोर्चे काढले. आपल्या मागण्यांची शासनाला निवेदने दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आंदोलन केले. लॉंगमार्च काढला. पायी दिंडीने विठ्ठलाला साकडे घातले. आत्मक्लेश आंदोलन केले तरीही शासनाला काही पाझर फुटताना दिसत नव्हता. शासनाच्या निर्णयाकडेच सर्व धरणग्रस्त आजपर्यंत डोळे लावून बसले होते.अखेर अनेक वर्षांच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या लढ्याला यश आले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यशाची किनार मिळाली आहे. कोयना धरणाच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार दि. 16 मे रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान, कोयनानगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते व श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांंच्या अध्यक्षतेखाली कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप शुभारंभ करण्यात येणार आहे.
तसेच याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांची भव्य परिषदही आयोजित केली आहे. यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालक मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, मदत व पुर्नवसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता, साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, श्रमिकचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, श्रमिकचे राज्य कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही श्रमिकचे चैतन्य दळवी यांनी शेवटी बोलताना दिली.