महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
इराण येथे कैदी बनवून डांबून ठेवलेल्या मर्चंट नेव्हीतील दोन भारतीय युवकांची तब्बल नऊ महिन्यांनी सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी साताराचे खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ते भारतात सुखरूप परतले आहेत. या सुटकेमुळे युवकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून खा. पाटील यांनी समयसूचकता बाळगून तात्काळ केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.
आनंदराव जगन्नाथ पाटील रा. शिरवडे यांचा मुलगा वीरेंद्र आनंदराव पाटील रा. शिरवडे ता. कराड व भरत रवींद्र पाटील रा. कवठेमहांकाळ जि. सांगली हे दोन युवक मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. वर्षापूर्वी मुंबईच्या एका एजन्सी मार्फत लिब्रा नावाच्या जहाजातून ते कामानिमित्त इराणला गेले होते. इराणच्या समुद्र हद्दीमध्ये गेल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून इराण सैन्याने त्या जहाजासह जहाजावरील अन्य दहा ते बारा व्यक्तींना अटक केली होती. त्यामध्ये या दोन युवकांचा देखील समावेश होता. अटक केल्यानंतर त्यांना तेथील बुशर बंदर येथील तुरुंगात बंदिस्त करून ठेवले होते. तसेच त्यांच्या जवळ असणारा मोबाईल व पासपोर्ट सुद्धा काढून घेतले होते. अनपेक्षितपणे झालेल्या या कारवाईने सदर युवकांचा घरच्यांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. तर या प्रकारची साधी कानकून देखील त्यांच्या घरच्या मंडळीना लागली नव्हती. त्यामुळे समुद्रापार अडकलेले हे भारतीय तरुण मोठ्या संकटात सापडल्याने घाबरलेल्या अवस्थेत होते.
दरम्यान तुरंगातील त्यांच्या एका इराणच्या मित्राला भेटण्यासाठी त्याची बहिण आली होती. तिला थोडेफार उर्दू समजत असल्याने या दोन तरुणांशी मोडकातोडका सवांद साधून तिच्या मोबाईलवरून व्हाटसअपद्वारे भारतातील त्यांच्या घरी संदेश पाठवला. त्यामुळे तीन महिन्यानंतर या घटनेची माहिती सदर तरुणांच्या नातेवाईकांना समजली. मात्र याबाबत स्पष्ट व सखोल माहिती नसल्यामुळे परदेशात अडकलेल्या आपल्या मुलांना कसे सोडवायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. तर त्यांच्या सुरक्षितते बाबतही चिंता लागून राहिली होती.
आनंदराव पाटील यांनी तात्काळ खा. श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांची भेट घेऊन झालेल्या प्रकारची हकीकत सांगितली. सारंग पाटील यांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून त्याबद्दल अधिक माहिती मिळवून ही बाब खा. श्रीनिवास पाटील यांना सांगितली. त्यानंतर खा.पाटील यांनी भारताचे पूर्वीचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांना सांगून सामाजिक कार्यकर्ते संजय पराशर यांच्या मदतीने व पाठपुरावा करून त्या दोघांची सुटका करण्यात आली. त्यानंतर इतर कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचे मायदेशात आपल्या घरी सुखरूप आगमन झाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथमता खा. श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. खा. पाटील यांची समयसूचकता व असणारा दांडगा संपर्क यामुळे त्या दोन तरुणांची अखेर मोठ्या संकटातून सुटका झाली.