महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(बिदाल )
माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणाऱ्या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तिथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.
उघडे असलेले रोहीत्र व घरांवर लोबंकाळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
दहिवडी येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाररामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिंडीग न तपासता तसेच त्या मिटर वरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत.
गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतांनाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत.अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.एखाद्या वेळेस शॉट-सर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.