फलटण : श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी, ( फलटण) या पतसंस्थेत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार हताश झालेले आहेत.
सदर पतसंस्थेच्या संचालकांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावे दाखल असून कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये त्यामध्ये फारशी काही प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर फलटणच्या काही गुंतवणूकदारांनी नुकतीच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याशी चर्चा केली. आणि पतसंस्थेत गुंतवलेले मुदत ठेवीचे पैसे परत मिळणे बाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. किंद्रे यांनी सांगितले की, यासंदर्भात यापूर्वीच फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यांचा तपास चालू आहे. यापूर्वी गुन्हे दाखल असल्यामुळे त्यासंदर्भात आता पुन्हा गुन्हे दाखल केले तरी आम्ही ते गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करणार. त्या पतसंस्थेच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा मिळाल्या नंतरही काही कारवाई करता येणार नाही.
त्यावर बारामतीचे कोठारी यांनी पुन्हा नव्याने वैयक्तिक गुन्हे दाखल करून घ्यावेत अशी विनंती केली. कारण नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना उच्च न्यायालयाच्या विद्यमान इंटेरियम रिलीफ चा अडसर येणार नाही. त्यामुळे कोठारी यांनी सर्व उपस्थितांना अशी सूचना केली की, पतसंस्थेतील मुदत ठेवीची रक्कम न मिळालेल्या गुंतवणूकदारांनी वैयक्तिक फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांची सुमारे दहा ते अकरा कोटी ची रक्कम असून ठेवीदार हताश झालेले आहेत. काही ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक न्यायमंचामध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडाळा विरोधात दावे दाखल केले आहेत. दाव्यांमध्ये पतसंस्थेचे कोणीही संचालक हजर न झाल्याने एकतर्फी निकाल देण्यात आलेले आहेत.