अमहदनगर : पोलीस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना येत्या काही दिवसांत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 7 हजार 200 पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिलीप वळसे-पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस भरतीची माहिती दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, ‘राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या 5 हजार 200 पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
गृहमंत्री यांनी पोलीस भरतीसंदर्भात दिलेल्या माहितीमुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. तसेच, 5 हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारीरिक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचे काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 हजार 200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5 हजार 200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे.