नवारस्ता प्रतिनिधी : शासकीय कार्यालयात पाच दिवसाचा आठवडा केला असला तरी अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता जैसे-थे कायम आहे. सर्वसामान्य नागरिक कामासाठी कार्यालयात कधीही आले तरी जागेवर अधिकारी, कर्मचारी मिळतील तेंव्हा नवलच.. कारण दिवसभरातील सहा तासाच्या ड्युटीत सकाळचा चहा, दुपारचे जेवण, आणि जेवणानंतरचा चहा यातच दोन ते तीन तासचा टाईमपास काही-अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कडून होत असेल तर उर्वरित तीन साडेतीन तासाच्या वेळेत सर्व सामान्य नागरिकांची कामे कशी काय होणार..? यात नेहमीच्या बैठका, मिटींगा आणि दौरे याचा ताळमेळ घालत साडेतीन तासाच्या ड्युटीत सहा तासाची ड्युटी टाईमपास करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण करावी लागत आहेत हे वास्तविक सद्याचे आश्चर्य आहे.
सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयात जेंव्हा जातो तेंव्हा कार्यालयात उपस्थित असणारा स्टाफ नागरिकांशी प्रथम व्यवस्थित बोलेलच असे नाही. साहेब आहेत का..?असे विचारल्यावर साहेब मिटींगला गेलेत, मुंबईला गेलेत, सातारला गेलेत, कोर्टात, हाय कोर्टात गेलेत, जेवायला घरी गेलेत – बाहेर आहेत, आतमधे मिटिंग चालू आहे अशीच उत्तरे अनेकवेळा ऐकायला मिळतात. सरकारी कार्यालयातील कोणतेही काम हेलपाटे मारल्याशिवाय होतच नाही हि सुरु असलेली परंपरा अशीच सुरु राहत असल्याची परस्थिती पाटण मधील अनेक शासकीय कार्यालयात दिसून येते. आठवड्याची सुरुवात सोमवार पासून होते तर शेवट मात्र शासनाने पाच दिवसांचा आठवडा करुन शनिवार ऐवजी शुक्रवारीच केला आहे. शनिवार, रविवारी आठवड्याची दोन दिवसांची सुट्टी देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याची मरगळ घालविण्यासाठी बहुअयामी सुट्टी दिली आहे. या सुट्टी मागील कारण काय तर राहिलेल्या पाच दिवसांच्या आठवड्यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक मरगळ झटकून काम करावे असा शासनाचा हेतू आहे. तरी देखील काही अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी शनिवार-रविवारी बहुअयामी सुट्टी भोगून देखील उरलेल्या पाच दिवसात कार्यालयातील व्यतिरिक्त टाईमपास कामाचा आनंद घेताना दिसतात. अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी सकाळीच गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकारीच कार्यालयात नाहीत म्हंटल्यावर कर्मचारीदेखील आढळ-मडळ करताना दिसतात. शासकीय कार्यालयातील काही अनेक अधिकारी कर्मचारी सकाळी १०.३० वा. सुमारास कार्यालयात येतात आल्या – आल्या काहींना चहा -पिण्यासाठी अर्धा तास टाईमपास करावा लागतो. कामात टंगळ-मंगळ करत दुपारी जेवणासाठी अर्धा तासाच्या ठिकाणी दिड – ते दोन तास जेवणासाठी सुट्टी घेतात, जेवायला सरासरी १.३० वा सुट्टी घेऊन ३ ते ३.३० पर्यंत कामावर हजर राहतात. दुपार नंतर राहिलेल्या दोन तासात मध्येच चहा साठी किमान अर्धा तास तरी वेळ घालविला जातो. आणि शेवटी पाच वाजले म्हणले की घरी जाण्याच्या तयारीची सुरवात होते. असा हा अनेक अधिकारी, कर्मचारी यांचा दिनक्रम. सहा तासाच्या ड्युटीत केवळ तीन तासच काम होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयात परवड का नाही होणार..? शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी लोकांच्याकडून होत आहे.
शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयात कधीही येतात आणि जातात. शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाला वेळेचे बंधन दिले आहेत. मात्र त्याची अमलबजावणी या कर्मचाऱ्यांच्या कडून होताना दिसत नाही. अनेक वेळा अधिकारी बैठाकांमधे व्यस्त असतात तर अनेकवेळा कामाच्या वेळेत त्यांचे अचानक दौरे देखील असतात. या बैठकां व दौऱ्यांची पुसटसही कल्पना सर्वसामान्य नागरिकांना नसते. पाटण तालुका अधिच भौगोलिक दृष्ट्या आठ विभागामध्ये विभागला गेला असल्यामुळे लांबच्या नागरिकांना स्वतःच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसून या नागरिकांचा विचार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी करावा.