उंब्रज-प्रतिनिधी-
उंब्रज शहरातील सर्वांत रहदारीचा व गजबजलेला रस्ता म्हणून उंब्रज-पाटण रोड ची ओळख आहे , उंब्रज-पाटण-चिपळूण हा राज्यमार्ग असून या मार्गावर शाळकरी मुले , व्यापारी , प्रवासी , ग्रामस्थ यांची सतत वर्दळ असते.चाफळ , कोयनानगर ही पर्यटनस्थळे असणारी गावे याच रस्त्याला येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक तसेच ट्रान्स्पोर्टची अवजड वाहने , या रस्त्यावरून धावत असतात , एकंदरीतच हा रस्ता लोकांनी व वाहनांनी सतत गजबजलेला असतो. पण अशा या महत्वाच्या रस्त्याची अवस्था मात्र अतिशय दयनीय झालेली आहे.रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून त्याची उकरून वरती आलेली खडी इतरत्र विस्कटली आहे , एकंदरीत पाटण रस्ता हा ” खड्ड्यांचा अड्डा ” बनला असून प्रवाशांना खड्ड्यांचे दणके सोसत वेदनादायक प्रवास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांची रोजच्या या त्रासापासून सुटका व्हावी व प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून , अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ यांच्या वतीने या खड्ड्यांभोवती रांगोळी काढून व वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची दाट शक्यता असून , कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी या गोष्टीस जबाबदार राहतील व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होईपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ पुणे मंडल च्या अध्यक्ष मिनाक्षी पोळ यांनी दिला असून , सध्या हे आंदोलन प्राथमिक स्वरूपातले असून येत्या चार दिवसांत खड्डे न मुजवल्यास संबंधित विभागातील अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासून हे आंदोलन अजून तीव्र केले जाईल असे ऑल इंडिया लेबर फेडरेशन चे सातारा जिल्हा अध्यक्ष योगेश पोळ यांनी दै.महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले , यावेळी अरुण कदम , दीपक हजारे यांच्यासहित इतर पदाधिकारी उपस्थित होते.