महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. २८ मार्च : राज्यातील कायम अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणीस नकार दिल्याने राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल यावेळी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर आत्तापर्यंत पार पडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना विभागीय मंडळात पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची – पालकांची चिंता वाढली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. तर याबाबत पत्रकार परिषद घेऊन, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या कृती समितीने दिला होता. त्यानुसार विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. विशेष म्हणजे बोर्डाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिकेचे गठ्ठे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांकडून ते गठ्ठे स्वीकारले जात नसून आलेले गठ्ठे परत महामंडळाकडे पाठवून दिले जात आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे