महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे ज्ञान, संस्कार आणि त्यातून परिवर्तन. आजचा विद्यार्थी भविष्यातील प्रगत भारताचा कणा असणार आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळाले तर यातून शैक्षणिक क्रांती घडून येईल. ही क्रांती घडविण्यासाठी पालकांसह समाजाने आपली जबाबदारी पार पाडवी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. मारूल हवेली (ता.पाटण ) येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व मारूल हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सारंग पाटील म्हणाले, शिक्षणाचे महत्व आता प्रत्येकाला समजत आहे. ज्ञानार्जनाबरोबर प्रत्यक्ष शिक्षणातून विद्यार्थ्यावर संस्कार व्हायला हवेत. मात्र त्यासाठी शिक्षण समाजभिमुख असायला हवे. सर्वात उत्तम परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे शिक्षण आहे. त्यामुळे इतर गुंतवणुकीकडे लक्ष देण्याऐवजी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन काळात जिद्द, चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. शिक्षण उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाचे हे साधन जीवनात वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. स्वताची व समाजाची प्रगती करू शकतो.
शिक्षणात अमुलाग्र बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्रातातील नवीन शैक्षणिक प्रणाली व नव्या तंत्रज्ञानाचेही ज्ञान अवगत करावे. यासंदर्भात पालकांनी काळजी घेऊन जबाबदारी पार पाडावी. याप्रसंगी सरपंच श्री.अशोक मगरे, उपसरपंच सौ.स्मिता कदम, ग्रामविकास अधिकारी श्री.मधुकर पाटील, माजी प्राचार्य डी.जी.नांगरे, सुभाष कोळेकर, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.मारूल हवेली विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सारंग पाटील व इतर