महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा :
कळंबे (ता. सातारा) येथील रस्त्याने निघालेल्या आजी आजोबासह दोन नातवांना अॅपे रिक्षाने ठोकरल्याने दीड वर्षाच्या नातीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत आजी व नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
संतप्त झालेल्या जमावाने मद्यधुंद रिक्षा चालकाला अडवून बेदम मार दिला आहे. या घटनेतील अॅपे रिक्षात उसाची पाचट टाकून संतप्त झालेल्या युवकांनी रिक्षा पेटवली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून तेथील वातावरण तंग झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कु. अनवी विकास इंदलकर (वय १.५ वर्ष) या एकुलत्या एक चिमुकलीला ठोकरल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात कु. श्रावण मदन इंदलकर (वय ३.५ वर्षे) व आजी सौ. रुक्मिणी कृष्णा इंदलकर (वय 58 वर्षे, सर्व राहणार कळंबे) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर चालक प्राण काशिनाथ पवार (वय 28, रा.आकले) या मालवाहतूक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कळंबे येथील भैरवनाथाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. यात्रेनिमित्त भैरवनाथाचे मंदिराबाहेरूनच देवाचे दर्शन घेऊन आजी-आजोबा आपल्या नातवांसह मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास घरी परतत होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या मालवाहतूक अॅपे क्र. एम एच- 11 बी एल 0623 या गाडीने पदाधिकाऱ्यांना मद्यधुंद अवस्थेत ठोकरले. अपघात करून चालकाने पलायन केले असता तेथील युवकांनी पाठलाग करून चालकास आडवले. संबंधित घटनेच्या ठिकाणी आणून चालकाला युवकांनी बेदम मारहाण केली. अॅपेमध्ये उसाची पाचट टाकून संतप्त झालेल्या युवकांनी अॅपेरिक्षा पेटवली.
या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी तालुका पोलिसांना दिली. घटनास्थळी रात्रीच पोलिस दाखल होऊन या घटनेवर नियंत्रण केले. संबंधित गाडी चालकास चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मुलाणी, कॉन्स्टेबल पाटोळे अधिक तपास करत आहेत.