तुर्तास बास..!
मधुसूदन पतकी
वृत्त संपादक
महाराष्ट्र न्यूज
श्री. शरद पवार निवडणुकीची तयारी करत आहेत ते क्रमांक एक लोकसभेची आणि क्रमांक दोन मुदतपूर्व किंवा मध्यावधी विधानसभा निवडणुकीची. लोकसभेची निवडणूक किमान पंधरा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन लढवायची, ती जिंकायची, पाच वर्ष पंतप्रधान म्हणून काम करायचे हे सोपे उद्दिष्ट नाही.
मी माझ्या मागच्या लेखात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.शरद पवार २०२४ च्या लोकसभा निवडणूक तयारीला लागल्याचे म्हटले होते. ते इलेक्शनोहोलीक ,कायम निवडणूक सज्ज असतात असेही म्हटले होते. ते एका उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्लॅन ए,बी,सी,डी असे चार प्लॅन तयार ठेवणारे कदाचित देशातील हे एकमेव राजकारणी असतील. दहा दिवसात श्री. प्रशांत किशोर यांना दुसऱ्यांदा भेटणे आणि यापुढेही वारंवार कदाचित भेटणे याचा अर्थ ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत हे नक्की. आता लोकसभा निवडणुकीची तयारी ;प्रादेशिक पक्षांची जमवाजमव, निवडणूक सल्लागार तज्ञांशी चर्चा, खलबते, बैठका यांची सुरू असलेली धावपळ पाहता श्री. शरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची जमवाजुळव करत करत विधानसभेच्या ही निवडणुकीची तयारी करत असतील. लोकसभा निवडणूक ठरल्यावेळी, निर्धारित कालावधीत होणार यात काही संशय किंवा कोणाच्या मनात शंका असणार नाही. भरभक्कम बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्ष पाच वर्ष ,पूर्ण काळ केंद्रातील सत्ता चालवणार ही काळ्या दगडावरची सध्यातरी पांढरी रेघ आहे. प्रश्न, शंका ,संशय येतो तो आघाडी, युती, बाहेरून पाठिंबा इत्यादी इत्यादी प्रकारच्या प्रादेशिक पक्षांच्या सत्ते बाबत. सबब श्री. शरद पवार निवडणुकीची तयारी करत आहेत ते क्रमांक एक लोकसभेची आणि क्रमांक दोन मुदतपूर्व किंवा मध्यावधी विधानसभेची. लोकसभेची निवडणूक किमान पंधरा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन लढवायची, ती जिंकायची, पाच वर्ष पंतप्रधान म्हणून काम करायचे हे सोपे उद्दिष्ट नाही. याची कल्पनाही श्री. पवार यांना नक्कीच आहे. मग गाठीभेटी बैठका यामागचे तर्क काय असू शकतात याचा एक धांडोळा घ्यावासा वाटतो.
…कही पे निशाना
तर तर्क क्रमांक एक नुसार ज्याचा वर उल्लेख केला आहे, तो म्हणजे वाघाच्या शिकारीची तयारी करा, ससा तरी नक्कीच हाती लागेल. वाघ मिळाला तर आनंदच.! महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष,( महत्त्वाचे) विचारात घेतले तर राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी ,भारतीय रिपब्लिकन पक्ष ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महत्त्वाचे पक्ष आहेत. तसेही मार्च २०१९ मध्ये राज्यात १४५ नोंदणीकृत पक्ष होते. दोन प्रादेशिक, राज्यस्तरीय तर देशात सात राष्ट्रीय पक्ष त्यावेळी नोंदवलेले होते. शिवसेना वगळता राष्ट्रवादीला अर्थात श्री.पवार यांना जागा मिळवून देणारा ,संख्येच्या दृष्टीने लक्षणीय असा दुसरा कोणताच पक्ष नाही .मनसेचे भवितव्य गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत केवळ राज ठाकरे असे व्यक्तिकेंद्रित आहे. विधानसभेत काही घडवण्यात, बिघडवण्यात वा घडवण्याची त्यांची ताकद नाही. जमा झाली नाही तेवढे संख्याबळ मनसेला मिळवता आले नाही. त्यातून श्री. पवार यांच्या महत्त्वाकांक्षेला हा पक्ष कितपत पुरा पडणार आहे ? मुळात या प्रकरणात नफा-तोटा याचा आलेख पाहून मनसे अर्थात श्री राज ठाकरे हे श्री पवार यांच्या खेम्यात सहभागी होईल.
सामावून घेणे वा पर्याय तयार करणे
श्री. शरद पवार यांच्यापुढे आव्हान आहे ते; श्री. रामदास आठवले, ॲड. बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर ,शेतकरी संघटनेचे नेते, यांच्या मतदारांना आणि नेत्यांना आपलेसे करून घेण्याचे. किंवा त्यांना पर्याय उभे करण्याचे. श्री. राजू शेट्टी आज राष्ट्रवादीच्या खात्यात आहेत ,मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन-तीन तालुक्यांच्या पुढे त्यांची ताकत नाही. लोकसभेला ही ते निवडून आले होते ते अदृश्य हातांच्या जोरावरच .त्यातूनही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राज्यातल्या शेतकरी संघटनांवर तसेच शेतकऱ्यांवर म्हणावा तसा आणि म्हणावा तेवढा परिणाम झालेला नाही. याचे कारण संघटनांमध्ये ,शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारी निमित्त श्री. पवार आपल्या राज्यातले पक्ष, त्यांच्या नेत्यांना आपल्याजवळ कसे रहातील याचा अंदाज घेतील व नियोजन करतील. थोडक्यात राज्यात निर्विवादपणे आपली; राष्ट्रवादीची आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा सध्याच्या हालचाली हा त्यांचा रणनितीचा एक भाग असावा. त्यात शक्यत्यांना सहभागी करायचे अथवा त्यांना पर्याय उभे करायचे.
संकटमोचक कोण.?
श्री. शरद पवार यांच्या बोलावण्यावर सुमारे पंधरा पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूक नियोजनासाठी दिल्लीत बैठकीस आले. श्री. शरद पवार सध्या राजकारणातील अनुभवाच्या दृष्टीने मोठे नाव आहे. बहुतेक सगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जोपर्यंत आपल्या राज्यात हे पक्ष नेते काम करतात तोपर्यंत वाद विवादाचे मुद्दे येणार नाहीत. मात्र एकत्रित काम करताना या मंडळींना सांभाळणे ही तारेवरची कसरत ठरते. हा प्रकार स्वर्गीय अटलजी ,नरसिंह रावजी यांच्या काळात पाहायला मिळाला. अगदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातही डॉक्टर सिंग यांच्या विद्वत्ता आणि समजूतदारपणा मुळे दहा वर्षे कारभार करता येण्यासारखी परिस्थिती राहीली.सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत जुनेजाणते व तरुण, ताज्या दमाचे सहकारी एकत्र राहिल्याने, ठेवल्याने दहा वर्षे डॉक्टर सिंग यांना पार पाडता आली. मात्र नव्याने स्थापन करू पहाणाऱ्या तिसर्या आघाडीत श्री. शरद पवार वगळता संकटमोचकाची जबाबदारी कोणी पार पाडू शकेल अशी व्यक्ती सध्या तरी दिसत नाही .
मोदी विरोध राज्याचा फॉर्म्युला ?
सध्या सत्ताकेंद्र बाहेर फेकले गेले आहेत मात्र मोदी विरोध हे ध्येय असणारी मंडळी, तसेच याच मंडळींच्या विरोधात लढून राज्यात सत्तेवर आलेली मंडळी या सगळ्यांना एकत्र आणून त्यांची मोट बांधणे आणि टिकवणे हे श्री. पवार यांच्यापुढे मोठे आव्हान असेल. आपापसातील प्रादेशिक अस्मिता आणि वैयक्तिक ध्येयधोरणे प्रादेशिक राजकारणात भिंती म्हणून उभ्या रहातात. मोदी हटाव या एकमेव अजेंड्यावर काही पक्ष एकत्र येतीलही; मात्र ते राज्यात ते एक दिलानी राहतील हे समजणे, वस्तुस्थिती असणे अवघड आहे. उदाहरणार्थ गृहीत धरू या मनसे आणि शिवसेना या तिसऱ्या आघाडीत एकत्र आले. मात्र राज्यात ते एकत्र किती मनापासून काम करतील हा प्रश्न आहे. हीच परिस्थिती केरळ,आंध्र ,तामिळनाडू येथे आहे. श्री.मोदी विरोध ही परिस्थिती आणि त्याला श्री. पवार या राज्यात फुंकर मारुन मान्यता मिळतील ही, मात्र तिथला एकमेकांच्या राजकीय विरोधाला श्री. पवार कसे शांत करणार? सबब तयारी लोकसभेची पण विधानसभा उद्दिष्ट ,या तत्वावर प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात. लोकसभेत यश मिळाले तर विधानसभेच्या यशावर शिक्कामोर्तब होईल . अन् लोकसभेचे अपयश विधानसभेची रंगीत तालीम होईल.
( पुर्वार्ध )