सातारा : साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट (Black list) यादीत सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या कारखान्यांना ऊस गाळपास देताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मुल्ला पुढे म्हणाले, 2020-21 च्या गाळप हंगाममध्ये ज्या कारखान्यांनी एफआरपी दिला नाही अथवा, एफआरपी देण्यास विलंब केला, अशा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो. महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी सुरुवातीला गाळप झालेल्या उसाचा ज्यादा दर दिला. परंतु, नंतर गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत दिली नाहीत. काही कारखान्यांनी उसाची बिले बुडविली आहेत. त्यात दुर्देवाने काही खासदार, आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी, गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगाव चालवणारे जरंडेश्वर शुगर, स्वराज इंडिया अग्रो लिमिटेड उपळवे, ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज या पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या पाच साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केलाय. शेतकऱ्यांनी या कारखान्यांना आपला ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही मुल्लांनी केले आहे.