:डॉ.श्रीमंत कोकाटे
“छत्रपती संभाजी राजांसारखा सुंदर, पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही.” असे समकालीन फ्रेंच पर्यटक ॲबे कॅरे लिहितो. तर मोगलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो “संभाजीराजे मोगलांसाठी शिवरायांपेक्षा दहापटीने तापदायक होते.” संभाजीराजे निःस्वार्थी, स्वराज्यनिष्ठ होते, असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद लिहितात. जेव्हा शिवाजी महाराज हे संभाजीराजांना स्वराज्याच्या वाटणीबाबत बोलले तेव्हा संभाजीराजे शिवाजीराजांना म्हणतात, “आपणास साहेबांचे पायांची जोड आहे, आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन.” दुधभात खाऊन शिवरायांच्या पायांचे चिंतन करून राहीन, परंतु राज्याची वाटणी नको, असे संभाजीराजे प्रस्तुत उद्गारावरून सुचित करतात. यावरून संभाजीराजांची विनयशीलता, प्रामाणिकपणा, स्वराज्यनिष्ठा आणि वडिलांप्रती असणारी पितृभक्ती स्पष्ट होते. संभाजीराजांचे शौर्य, पराक्रम, औदार्य, नैतिकता उच्च कोटीची होती. ते मराठी, संस्कृत, हिंदीसह इंग्रजी भाषेचे विद्वान होते. त्यांच्या बिरुदावलीवरून मतभिन्नता आहे. वाद राजकीय असला तरी वैचारिक पातळीवर त्याचा उहापोह होणे अत्यावश्यक आहे.
मुळात शिवकालीन, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराबाईकालीन संघर्ष हा राजकीय संघर्ष होता, तो लढा धार्मिक लढा नव्हता. परंतु औरंगजेब मात्र कट्टर धर्मांध होता औरंगजेबाने संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले, परंतु त्यामागे धार्मिक कारणे नसून राजकीय कारणे आहेत, असे वा.सी. बेंद्रे आणि डॉ. जयसिंगराव पवार यांनी म्हटले आहे. लढा धार्मिक नव्हता याचा अर्थ शिवाजीराजे, संभाजीराजे धार्मिक नव्हते, धर्माभिमानी नव्हते, असा होत नाही. ते धर्माभिमानी होते. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी शंभू महादेव, तुळजाभवानी यांच्या प्रति नितांत श्रद्धा ठेवली. शिवरायांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदिर बांधले. संभाजीराजांनी बुद्धभूषण या ग्रंथात गणपती, शिवशंकर, पार्वती, श्रीभवानी यांचे वर्णन केलेले आहे. ते संस्कृत पंडित होते. त्यांनी स्वधर्माचा अभिमान बाळगला, पण इतर धर्माचा द्वेष केला नाही. ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा,अशी त्यांची भूमिका होती. सर्व धर्मांच्या धर्मस्थळांचा, धर्मग्रंथांचा आदर केला. याचा अर्थ ते निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष होते, असे नाही.
औरंगजेब मात्र प्रचंड क्रूर, निर्दयी आणि पाताळयंत्री होता. त्याने वडिलांना नजर कैदेत टाकून त्यांचे हाल हाल केले. बंधू दारा आणि सुफी संत सरमद यांचा शिरच्छेद करून आग्रा शहरातून त्यांची प्रेतयात्रा काढली. त्याला मुलाप्रती प्रचंड अविश्वास होता. त्याने शीख आणि सतनामी यांचे बंड नष्ट करण्यासाठी त्यांच्या गावावरती निर्दयपणे हल्ले केले. स्त्रिया आणि लहान मुलांचा अमानुषपणे छळ केला. छत्रपती शिवाजीराजे यांनी निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्याने संपूर्ण भारतातील खजिना महाराष्ट्रात ओतला. धर्मांध सनातनी आणि धर्मांध औरंगजेब यांच्या संगनमतातून संभाजीराजांना निर्दयपणे ठार मारण्यात आले. त्यांच्या हत्येनंतर छत्रपतींचा कुटुंब कबीला औरंगजेबाच्या कैदेत गेला.
संभाजीपुत्र शाहू महाराजांना धर्मांतर करण्यासाठी औरंगजेबाने दबाव टाकला, परंतु शाहू राजांनी मोठ्या धैर्याने याला विरोध केला. शेवटी त्या बदल्यात सरसेनापती प्रतापराव गुजर यांची दोन मुले खंडेराव आणि जगजीवनराव यांना औरंगजेबाने सक्तीने मुस्लिम केले. खंडेराव आणि जगजीवनराव यांच्यामुळे मराठ्यांचा छत्रपती धर्मांतर होण्यापासून वाचला. औरंगजेबाचा कैदेत असणाऱ्या राजाराम महाराजांच्या मुलींचा विवाह त्याने समशेर बेग आणि नेकनाम यांच्याशी लावून दिला तर संभाजीराजांच्या मुलीचा विवाह त्याने मोहम्मद मोहिनुद्दीन याच्याशी लावून दिला. औरंगजेबा धर्मांध होता. तो धर्मवेढा होता. त्याच्या निर्दयतेविरुद्ध शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी शेवटपर्यंत लढले. छत्रपती संभाजी राजांना हालहाल करून निर्दयपणे ठार मारणाऱ्या व सक्तीने धर्मांतर करणाऱ्या, सक्तीने लग्न लावणाऱ्या, सामान्य रयतेला छळणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही.
धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी या संकल्पना आधुनिक आहेत. युरोपात रेनीसांस अर्थात पुनर्जागरण चळवळी नंतर तेथे वैज्ञानिक शोध लागले. ग्रंथ प्रामाण्य नाकारले गेले. मानवतावादाला प्राधान्य मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली. त्यासाठी वसाहतींची गरज होती. त्यासाठी युरोपियन जगभर गेले. औद्योगिक क्रांतीनंतर धर्मनिरपेक्ष संकल्पना उदयाला आली. राज्यसंस्थेला कोणताही धर्म नसतो, याचा अर्थ राज्यसंस्था कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा अनुनयही करणार नाही, यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात. निधर्मी म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माचा अंगिकार नव्हे, धर्मविरहित असणे होय. धर्मनिरपेक्ष - निधर्मी या संकल्पना आधुनिक आहेत. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतीय राज्यव्यवस्थेने स्वीकारलेली आहे. ती उत्तमच आहे. ती उदात्त आहे. बहुप्रवाही सांस्कृतिक भारतीय परिप्रेक्ष्यात ती अत्यावश्यकदेखील आहे, परंतु या संकल्पना आधुनिक आहेत. त्या मध्ययुगीन किंवा प्राचीन इतिहासावर लादणे विसंगत आहे.
छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे परधर्मीयांचा आदर सन्मान करणारे होते, याचा अर्थ ते सामान्य प्रजेवर धार्मिक अत्याचार होत असताना केवळ शांतपणे पाहत बसणारे नव्हते, औरंगजेबाने जेव्हा बिगर मुस्लिम प्रजेवर जिझिया कर लादला, तेव्हा शिवाजीराजांनी औरंगजेबाचे प्रबोधन करणारे अर्थात त्याला नीट समज देणारे प्रदीर्घ पत्र लिहिले. नेताजी पालकर मुस्लिम झाले होते, ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना शिवरायांनी स्वधर्मात घेतले. औंरंगजेबाच्या काळात गंगाधर कुलकर्णीला सक्तीने मुस्लिम केले होते, याबाबतचा वृत्तांत संभाजीकालीन पत्रसारसंग्रहात आलेला आहे. त्यावेळेस संभाजीराजांनी त्याला स्वधर्मात घेतले, या बाबी त्यांचा धर्माभिमान सांगतात.
छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे धर्माभिमानी होते, पण त्यांचा धर्माभिमान आजचे धर्मांध सनातननी सांगतात तसा नव्हता. यासाठी समकालीन दोन संदर्भ महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सभासदांनी म्हटले आहे "हा मराठा पातशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही." सभासद हे मराठा पातशाहा असा उल्लेख करतात. दुसरा संदर्भ राजाराम महाराज मराठा सरदारांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात "हे मऱ्हाटे राज्य तुम्ही आम्ही खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्षा) धरून स्वामीकार्य करावे."
वरील दोन संदर्भांवरून स्पष्ट होते की शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराजांच्या काळात "मराठा धर्म" अशी संकल्पना होती. मराठा ही व्यापक संकल्पना आहे ,ती समूहवाचक संकल्पना आहे. ती जातीवाचक नाही. शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज यांनी मराठा धर्माचा अभिमान बाळगला, सनातनी धर्माचा नव्हे, त्यांना धर्म हवा होता. ते धार्मिक होते, परंतु त्यांना स्त्रियांचा आदर सन्मान करणारा धर्म हवा होता. समतावादी धर्म त्यांना अभिप्रेत होता. सर्व जातीधर्म यांना सोबत घेऊन पुढे जाणारा प्रागतिक विचारांचा चातुर्वर्ण्या नाकारणारा धर्म त्यांना अभिप्रेत होता. ते धर्मवीर होते, परंतु सनातनी विचारांचे नव्हे, तर प्रागतिक विचारांचे! ते स्वराज्यरक्षक होते, सर्वात महत्त्वाचे ते छत्रपती होते. छत्रपती पद हे सर्वश्रेष्ठ पद आहे.
प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात "संभाजीचा धर्म कोणता?" संभाजीराजे शाक्त होते. ते शक्तीचे उपासक होते. शाक्तपरंपरेत स्त्रियांना प्राधान्य असते. त्यामुळे शंभुराजांनी आपल्या महाराणी येसूबाई यांना कुलमुखत्यार करून सर्वाधिकार दिले. त्यांनी स्त्रियांचा आदर सन्मान केला. शाक्ताने भेदभाव पळायचा नसतो, संभाजीराजांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनात भेदभाव बाळगला नाही. त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे शरद पाटील म्हणतात "संभाजी जात्यंतवादी शाक्त हुतात्मा होता.!" म्हणजेच ते शाक्तवीर होते, ते शाक्त धर्मवीर होते, असे शरद पाटील म्हणतात.